दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे : ”महागाई हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित विषय आहे. त्यावर फार बोलण्याने काही उपयोग होत नाही. १० वर्षांपूर्वी ४० हजार रुपयांचा मोबाईल, आज चार हजार रुपयांना मिळतो.
यावरून गेल्या १० वर्षांत महागाईच्या दराच्या तुलनेत तो स्वस्तच आहे, हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असे सांगत देशात वाढलेली महागाई ही जगाच्या तुलनेत कमीच आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. पुणे दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, गणेश बिडकर, गणेश घोष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दर कमी झाले की मोदी सरकारमुळे कमी झाले, जास्त झाले की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे झाले, हे कितपत योग्य आहे, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ”समाजामध्ये चांगली गोष्ट घडली की त्यांचे श्रेय घेतले जाते. हे घडतच राहणार आहे. पूर्वी डिझेल- पेट्रोलवर केंद्र सरकारचा कंट्रोल असायचा. मनमोहन सिंग यांच्या काळात हा कंट्रोल आंतरराष्ट्रीय बाजाराकडे गेला आहे.” मात्र हे सांगतानाच त्यांनी बेरोजगारीबाबत उत्तर देणे टाळले. मध्यवर्ती निवडणुकांबाबत ते म्हणाले, ”फक्त आणि फक्त आमदार निघून जाऊ नये, यासाठी या भीतीतून वारंवार बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच व्यासपीठावर चार आमदार देखील राहिलेले नाही. आमदार सोडा, गजानन किर्तीकरांसारखे नेते सोडून जात आहेत.