दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
अमरावती: राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मागच्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला.
यानंतर त्यांनी आता शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे व अजित पवारांनी जे केलं नाही, ते शिंदे फडणवीस सरकारने केलं, अशी प्रतिक्रिया देत दिव्यांग मंत्रालय मंजूरीनंतर आमदार बच्चू कडू यांनी शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले. नेमकं काय म्हणाले बच्चू कडू – दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा आज मुंबईत कॅबिनेटमध्ये झाली. यानंतर अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाला मंजुरी आज मिळाली. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनादिवशी अधिकृत घोषणा राज्य सरकार करणार आहे. तर देशात प्रथमच दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय होणार, याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनाथांचेच नाही तर दिव्यांगांचे सुद्धा नाथ आहे. आमचा 20 वर्षांचा लढा त्यांनी वीस दिवसात पूर्ण केला. दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव ठाकरे व अजित पवारांकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी काम केलं नाही. तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी वीस दिवसात केलं. त्यामुळे दोघांचे लाख लाख आभार, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.