दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : एकीकडे राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहे. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देतायत. काल जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय.
जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागले. आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. राष्ट्रभाषेचा पेपर असताना या विषयाकडे विद्याथ्र्यांनी पाठ फिरविल्याचे पहावयास मिळाले.
फोन करूनही आले नाही विद्यार्थी
हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. मात्र केंद्र प्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले, तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं.