दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिकांची नासाडी झाली. आधीच हमीभाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेला शेतकरी आता निसर्गाच्या लहरी हवामानामुळे खचला आहे.
याप्रश्नी सभागृहात गोंधळ सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. हो, मी घरी बसून कारभार केला. पण आता तुम्ही बांधाबाधांवर जा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कसबा पेठ पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर त्यांनी आज मातोश्रीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर, रवींद्र धंगेकर, आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विरोधक एकजिनसीपणाने एकत्र झाले तर आपण जिंकू शकतो, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. तसंच, पुढच्या निवडणुका याचपद्धतीने काम करून जिंकूया, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाचीही आठवण काढली.
अवकाळी पाऊस आपल्याला लागलेला शाप आहे. नैसर्गिक संकटे येत असतात. ती टाळू शकत नाहीत. अशावेळेला शेतकऱ्यांना मदत करणं, आधार देणं सरकारचं काम आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. तो राबला नाही, पिकवलं नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही. तत्काळ पंचनाम्याचे आदेश देणे हे शासकीय आदेश आहेत. मीही दिले होते. परंतु, आपली मदत शेतकऱ्यांच्या दारात पोहोचते आहे की नाही हे वं लागतं. निकषापलिकडे जाऊन आम्ही चक्रीवादळावेळी मदत केली होती. त्यामुळे आताही कोणतेही निकष न पडताळता तातडीने शेतकऱ्यांना आधार द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, होय, मी घरी बसून कारभार केला. मग आता तुम्ही बांधा-बांधावर जा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे.