दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवि दिल्ली : माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची आज (शनिवार) पटियाला तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधींचं कौतुक केलं. सध्याच्या घडीला क्रांतीचं दुसरं नाव म्हणजे राहुल गांधी असं त्यांनी म्हटलं आहे.
जेव्हा जेव्हा या देशात हुकुमशाही आली तेव्हा तेव्हा क्रांती झाली. आज मी छातीठोकपणे सांगतो की, या क्रांतीचं नाव आहे राहुल गांधी आणि ते या सरकारची मुळं उखडून टाकतील. आज देशात लोकशाही नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. माझा छोटा भाऊ भगवंत मान याच्यासाठी देखील हे आहे. आज लोकशाही साळखदंडात बंद आहे, पंजाब या देशाची ढाल आहे त्या ढालीला तोडण्याचं काम केलं जात आहे. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट रचला जात आहे. ज्या ज्या राज्यात अल्पसंख्यांक सत्तेत आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकार षडयंत्र रचत आहे”, अशा शब्दांत नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.