दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : शहरातील जिल्हापरिषद परिसरात लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेले जिजाऊ सभागृह केवळ प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे लोकार्पणच्या अभावी धूळखात पडले आहे. या बाबत अनेक वेळा जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देउनही जिल्हापरिषद प्रशासनाला मुहूर्त सापडला नाही, असा आरोप करत येत्या १४ एप्रिलच्या शुभ मुहूर्तावर ” भिमजयंती ” साजरी करून सदर सभागृहाचे सार्वजनिक लोकार्पण करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद वाशिम यांना नुकत्याच दिलेल्या स्मरण पत्रातून देण्यात आला आहे.
दिलेल्या स्मरण पत्रात संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, सदर ईमारत बांधण्यासाठी शासनाचे म्हणजेच पर्यायाने जनतेचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. परंतु एव्हढा अमाप निधी खर्च करून सुसज्ज झालेले जिजाऊ सभागृह केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकार्पण अभावी जनतेच्या सार्वजनिक उपयोगात न येता, निर्जन व ओसाड अवस्थेत धूळखात पडले आहे. यापूर्वी दिलेल्या निवेदनातून सबंधित प्रशासनाला विनंती करण्यात आली होती की, सदर सभागृहाचे रितसर लोकार्पण करून सार्वजनिक उपयोगाकरिता खुले करण्यात यावे व जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलामुलींचे लग्नकार्यासाठी सुसज्ज असलेली सभागृहाची इमारत मंगल कार्यालय म्हणून निःशुल्क उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना लग्नकार्यासाठी शासनाचा थोडफार आधार मिळेल. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिजनासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु करुन त्या अनुषंगाने सुद्धा जिजाऊ सभागृह सार्वजनिक उपयोगात आणता येईल. तथापि संभाजी ब्रिगेडच्या या स्तुत्य व योग्य मागणीकडे सबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आजतागायत कुठलीही हालचाल केली नाही. परिणामी येत्या १४ एप्रिल रोजी जगभर साजरी होणारी ” भिमजयंती ” आम्ही जिजाऊ सभागृहात साजरी करून सदर इमारतीचे सार्वजनिक लोकार्पण करू असा इशारा दिलेल्या स्मरण पत्रातून संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देतांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, जिल्हा सचिव शेख इसाक, जिल्हा प्रवक्ता विकास देशमुख, विद्यार्थी आघाडीचे इस्माल पठाण, तालुका अध्यक्ष अजय गवारगुरू, एजाज शेख, राहुल सोमटकर, प्रल्हाद पाटील, सीताराम व वाशिमकर आदींची उपस्थिती होती.