दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार आणि रविवारी अयोध्या दौऱ्यावर होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते, पण काही आमदार मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायला गेले नाहीत, यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या.
यामध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांचाही समावेश होता. एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गेले नसल्यामुळे संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. काही आमदार अस्वस्थ असल्यामुळे ते अयोध्येला गेले नसल्याचं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांच्या या टीकेला शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अस्वस्थ आहेत. प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळाल्यानंतर त्यांच्या अस्वस्थतेमध्ये वाढ झाली आहे. आता तर आमचा अयोध्या दौरा यशस्वी झाल्याने येत्या काही दिवसांमध्येच संजय राऊत मुंबईच्या रस्त्यांवर दगड मारत फिरतील,’ अशी बोचरी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. सांगोल्यामध्ये ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपण अयोध्या दौऱ्यावर गेलो नाही, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही अस्वस्थ होते, पण आता आमची भाजपबरोबर नैसर्गिक युती झाल्यामुळे मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय. मतदारसंघाचा विकास होतोय, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. संजय राऊत यांचं अस्तित्व हे आभाळातील एका टिकलीप्रमाण आहे, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी हाणला आहे.