दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जुनला “नशा मुक्त भारत पंधरवडा”चा होणार शुभारंभ , नशा मुक्तीसाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश; अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
जालना -आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थ सेवन विरोधी (२६ जून) दिनाचे औचित्य साधून विभागप्रमुखांनी दि. १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत जालना जिल्ह्यात “नशा मुक्त भारत अभियाना”अंतर्गत विविध उपक्रम त्यामध्ये महिला मंडळे, युवकमंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, प्राथमिक विद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जनजागृती मोहिम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रतिज्ञा, पथनाट्य, एकांकिका, पोस्टर्स, स्लोगन्स इत्यादी स्पर्धांचे आयोजन करुन ” नशा मुक्त भारत पंधरवडा’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सोमवार, दि. १२ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “नशा मुक्त भारत पंधरवडा” चा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नशा मुक्ती शपथ घेण्यात येणार आहे, या कार्यक्रमास सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने डिसेंबर १९८७ च्या पारित केलेल्या ठरावानुसार दरवर्षी २६ जून हा दिवस “ड्रग्ज ॲम्ब्युज आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस” म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार दरवर्षी २६ जून हा आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानुषंगाने भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोका विरुध्द लढण्यासाठी “ड्रग्ज मुक्त भारत दिवस” साठी एक संकल्प निश्चित केला आहे. त्यांचे पालन करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने दि. १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहिर केला आहे. अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थ सेवन विरोधी (२६ जून) दिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहिम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रतिज्ञा इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून नशा मुक्त भारत अभियान राबविण्याच्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे, असे असे प्रसिद्धी पत्रकार द्वारे समाज कल्याणविभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे.