दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
परळी-: बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कृषी महर्षी स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या 5 व्या पुण्यतिथीनिमित्त मुंडे परिवाराच्या वतीने •मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बालयोगी ह. भ. प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या श्री वाणीतून सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची आज सांगता झाली.
या सप्ताहाच्या सांगतेवेळी ह. भ. प. समाधान महाराज शर्मा (केजकर) यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. बालयोगी हरिहर महाराजांच्या वाणीतून भागवत कथेचा शेवट व त्यानंतर संगीत विशारद ह. भ. प. शर्मा महाराज यांचे संगीतमय सुश्राव्य कीर्तन यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह मुंडे कुटुंबीय, नाथरा व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
तत्पूर्वी ना. धनंजय मुंडे यांनी स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे नाथरा निवासस्थान येथील स्मृतीशिल्प तसेच कन्हेरवाडी परिसरातील अण्णांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. “अण्णा तुम्ही जसे तुमच्या आयुष्यात गोरगरीब, शेतकरी-कष्टकऱ्यांना सावरलत, त्याचाच आदर्श घेऊन आज मी लोकांसाठी काम करतो आहे”, असे भावनिक ट्विट करत ना. मुंडेंनी स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.