दैनिक चालु वार्ता चंद्रपूर प्रतीनिधी-दीपक कटकोजवार
ईशान्येकडील विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळवले. महाराष्ट्रात विधान सभेची निवडणूक व्हायची आहे. पण, देश पातळीवर जो मध्यमवर्गीय, त्याहीपेक्षा थोडा उच्चवर्णीय श्रीमंत वर्ग, भाजपाच्या सोबत आहे, अशी हवा गेली दहा वर्षे चालू होती. महाराष्ट्राने याला पहिला तडाखा दिला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार हे श्रमिक महाराष्ट्रासारखे मतदार नाहीत. ते शिक्षित आहेत. समाजमाध्यमांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. बरेचसे उच्चवर्णीय आहेत. जिथे भाजपाचे प्राबल्य आहे, अशा नागपूर आणि अमरावतीत… भाजपाचा एकप्रकारे ‘अड्डा’ असलेल्या या भागात, पहिला दणका भाजपाला मिळाला तो त्या निवडणुकीत. त्यानंतर दोन पोट निवडणुका झाल्या. १) कसबा मतदारसंघातील… हा मतदारसंघही पुण्यातील बऱ्याचशा चांगल्या स्थितीत असलेल्या लोकांचा. ज्यात सदाशिवपेठसुद्धा येते. म्हणजे त्यात सगळे काही आले. त्यामुळे या पोट निवडणुकीत बेकारी, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न कळीचे नव्हतेच. तसं पुण्यात महागाई-बेकारी हे प्रश्न फार मोठ्या तावाने चर्चिले जात नाहीत. अर्धे पुणे शनिवारी-रविवारी, दुर्वांकुर… आशा डायनिंग… पुणे गेस्ट हाऊस इथेच दुपारी आणि संध्याकाळी असतं. आणि एरवी सकाळी, रूपाली…. दिपाली… वाडेश्वरपुढे रांगा….. अशा या पुण्यात आणि खास करून कसब्यात भाजपाचा पराभव का झाला? दोन दिवस यावर लिहायचे थांबलो होतो. जे जे प्रसिद्ध झाले, ते ते वाचत होतो. त्यात या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही. या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा जास्त महत्त्व आले होते. पोट निवडणूक होती… अशा निवडणुकीच्या निकालाने राज्यावर फार फरक होत नसतो. पण, ती निवडणूक इतकी उंचावर नेऊन ठेवली की, मला असे वाटत होते की, बहुतेक आता प्रचार संपायच्या आगोरदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याही सभा लावल्या जातील! कारण फडणवीस हट्टाला पेटले होते. तेच या निवडणुकीचे प्रमुख होते. (पुढच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनाच प्रमुख करा… कारण त्यांना मुख्यमंत्री असताान भाजपाला बहुमत मिळवून देता आले नाही. आता तर त्यांचा फोटो वर्तमानपत्रातसुद्धा घडीच्या खालीच आहे.) नागपूर अमरावती गमावल्यामुळे ते घायकुतीला आले होते. परंपरागत ३२ वर्षे या मतदारसंघातून भाजपा निवडून येत होते. मग आता असे काय घडले होते? फडणवीस यांच्यापासून भाजपाच्या सगळ्या नेत्यांना- त्यांनी कितीही वचवच केली तरी – आतून ठामपणे असेच वाटत होते की, ही जागा आपण जिंकत नाही. एकदा मनाला निराशा आली की, डोकं कामातून जातं. या मतदारसंघात ३२ वर्षे गिरीष बापट यांचे वर्चस्व. ते लोकभेत निवडून गेले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांचा शब्दप्रमाण. पण, ते आजारी झाल्यापासून परवाची निवडणूक लागेपर्यंत, भाजपाच्या नेत्यांना त्याची आठवण नव्हती. जेव्हा त्यांनी प्रचारात उतरण्याची गरज वाटली तेव्हा त्यांच्या घरी जाऊन प्रथम त्यांची चौकशी… मग, पुण्यात अमित शहा आल्यावर बापटांच्या घरी प्रकृती चौकशीसाठी भेट. त्याला जोडून दगडूशेठ गणपती दर्शन. हे सगळे नाटक मतदारांना चांगलेच समजत होते. नळ्या घालून बापट यांना प्रचारात उतरवणे हा फडणवीसांचा अट्टाहास… मतदारांना अजिबात आवडला नाही. शिवाय टिळक घराण्यात उमेदवारी नाकारली… एवढेच नव्हे तर आतापर्यंत निवडणूकीची सगळी सूत्र बापट यांच्या सल्ल्यानी चालायची…. यावेळी कोल्हापुरातून पुण्यात पेशव्यांच्या मतदारसंघातून निवडून आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हातात निवडणुकीची सगळी सूत्रं गेली. पराभवाची सुरुवात याच निर्णयाने झाली. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे नेते कधीही होऊ शकत नाहीत. पुण्याचेही नाहीत… पुढच्या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांना फेसच येईल. मर्यािदत आवाक्याचा…. पण मराठा समाजाचा असल्यामुळे, त्यांचे महत्त्व वाढवलं गेले होते. आता दणकट मुख्यमंत्रीच मराठा समाजाचा मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील आपोआप बाजूला फेकले गेले. त्यांनी सूत्रं हातात घेतली…. इथूनच भाजपाच्या हातातून निवडणूक निसटली… शिवाय फडणवीस यांना तर ते अजिबात आवडले नव्हते. (एक आठवण म्हणून सांगतो…. ‘मीच पुन्हा येईन’वाल्या फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून पहाटे शपथविधी झाला… ही गोष्ट चंद्रकांत पाटील यांना सकाळी ९ वाजता समजली.)
या निवडणुकीत आणखीन दोन घटना अशा घडल्या…. पोट निवडणूक असताना मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकला. पुण्यातील या मतदारसंघातील ‘जातवार’ नेते शोधून काढले. त्यांना बोलावून घेतले… मुख्यमंत्र्यांच्या भाषेत काय सांगायचे ते सांिगतले… पुण्यात उघडपणे चर्चा आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या मतदारसंघातील आणि पुण्याच्या सी. पीं.ना बोलावून घेवून त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याचीही शिकवणी झाली म्हणतात.. योग्य मदत झाली नाही तर गोंदीया, भंडारा येथे पोलीस स्टेशन आहेत, याची आठवणही करून दिली, असे पुण्यात सर्रास बोलले जात आहे. शिवाय महात्मा गांधी यांचे फोटो मोठ्याप्रमाणात होतेच…. त्याचाही खूप वापर झाला…एका कार्यकर्त्याने तर सांगितलेकी, मुस्लिम मतदारांना ‘मताला येऊ नका, असे सांगून पैसे दिले… तर काहीजणांच्या बोटावर मतदान केल्यावर जी शाई लावतात… तशी शाई लावली….’ हे असे असेल तर गंभीर आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. तरीही पोलिसांचे रिपोर्ट असे की, ‘ही जागा काही भाजपा जिंकत नाही’ मग, शनिवारवाड्याजवळ असलेल्या एका दर्ग्याचा विषय उकरून काढला गेला. त्याच्याखाली एक देवालय आहे, हा प्रचाराचा भाग झाला. मग, अधिकृतपणे गोष्ट स्पष्ट केली गेली की, ‘तो जो दर्गा आहे त्या दर्ग्याला दिवा-बत्ती, धूप-धूपारे याचा सगळा खर्च शिवाजी महाराजांनी अज्ञाा दिलेल्या राजपत्रात आहे.’ मग हा ही मुद्दा कामाला येत नाही, हे लक्षात आले. राहीला ब्राम्हण समाजाचा प्रश्न. टिळक घराण्यात उमेदवारी मिळाली नाही म्हणून, ब्रम्हवृंद समाज रूसला असे सांगण्यात येत होते. त्यांनाही चुचकारण्यात आले. बापट आता लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत. इतके त्यांचे आजारपण टोकाचे आहे. पुढचा उमेदवार कोण हे सांगा? इथपर्यंत ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी प्रश्न विचारले… कोणत्याही गोष्टीची सुरुवात… ‘एक गरिब ब्राम्हण होता….’ या शब्दाने होते… तिथे पुण्यातील ब्राह्मण समाजाचे नेते आक्रमक होण्याची ही बहुधा पहिलीच निवडणूक! तसे १९९० साली आण्णा जोशी या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत आमच्या अण्णुजींना (आम्ही मित्र त्यांना अण्णूजी म्हणायचो…) भाजपाने उमेदवारी दिल्यावर पोटनिवडणुकीत गिरीष बापट यांना उमेदवारी मिळाली. पण, भाजपाच्या चार नगरसेवकांनी तेव्हा बंड केले. काँग्रेसचे उमेदवार वसंत थोरात यांचा प्रचार केला. शेवटी थोरात निवडून आले. १९९१ नंतर २०२३ ला काँग्रेसने ही जागा जिंकली. भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. ते २० वर्षे भाजपाचे नगरसेवक. चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष. पण, विरोधातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ही चारवेळा नगरसेवक. पण त्यांच्याजवळ माेठी गाडीही नाही. हे दोन्ही उमेदवार एक कासार समाजाचा आणि धंगेकर लोणार समाजाचे. म्हणजे काहीसे मुख्य प्रवाहापासून वेगळे… दोन उमेदवारांमधील साधा उमेदवार कोण? त्याचा मतदारांना लगेच अंदाज आला. शिवाय काँग्रेसने पहिल्या प्रथम शहाणपणाने चांगल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. नाना पटोले हे चार दिवस मुक्काम ठोकून बसले. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनीही शक्ती पणाला लावली. अजितदादांनी मनापासून त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना कसब्यात कामाला लावले. प्रत्येक मुलाखतीत धंगेकर यांचा, हातचे न राखता, उल्लेख केला… राष्ट्रवादीने मनापासून मदत केली. हे चित्र महाराष्ट्रात कायम राहीले तर… महाराष्ट्र भाजपाच्या हातात कधीच जाणार नाही…
आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘महाविकास आघाडी’ने ही निवडणूक लढवली. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना असे तीन पक्ष. तिघांनी प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीने आपला उमेदवार आहे, असे समजून ताकद लावली. त्या सगळ्याचे नियोजन राष्ट्रवादीचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी चोखपणे केले. तीन पक्ष प्रामाणिकपणे एकत्र लढले तर…. आज पुन्हा सांगतो…. ‘महाराष्ट्रात मोदी येवोत, शहा योवोत… फडणवीस, शिंदे यांना बहुमत मिळवणे शक्य नाही.’ शिंदे यांच्या शिवसेनेची तर अजून परीक्षा व्हायचीच आहे. त्यांच्या पक्षाने अजून एकही निवडणूक लढवलेली नाही. अंधेरीतील पोट निवडणुकीतही त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली. तिथेही भाजपा आणि शिंदे गटाने ताकद लावली. तरी शिवसेनेच्या ऋतुजा लटके याच विजयी झाल्या. अर्थात त्यांचे पती त्याच मतदारसंघात आमदार होते… त्यामुळे एका भगिनीवर वैधव्य आल्यावर सहानुभूती वाटणे स्वाभाविक आहे… त्याचा फायदा ऋतुजाताईंना मिळाला, हे कोणी अमान्य करणार नाही. तीच सहानुभूती पिंपरी-चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या मागेही होती. कारण त्यांचे पती भाजपाचे आमदार लक्ष्मणराव जगताप लोकप्रिय होते. पण, तरीही श्रीमती अश्विनीताईंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. राष्ट्रवादीतून फोडा फोडी करून मतं फोडण्याकरिता अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना फडणवीस यांनी उभे केले. त्यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. म्हणजेच भाजपाच्या विरोधात १ लाख ४४ हजार ५४७ मते पडली आहेत. आणि विजयी उमेदवार अश्वीनीताईंना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली आहेत. त्याचा दुसरा अर्थ असा की, ही लढत आश्वीनीताई आणि राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांच्यात सरळ झाली असती तर… सहानुभूती असतानाही आश्वीनीताई पराभूत झाल्या असत्या. आजही भाजपाच्या विरोधात पडलेली मते ९ हजारांनी जास्त आहेत. सहानुभूतीच्या लाटेतही बहुसंख्य मतदार भाजपाच्या विरोधात आहेत. आणि िपंपरी- चिंचवड हा पुण्याचाच भाग आहे. एकप्रकरे शहरी विभाग आहे. नागपूर, अमरावती, पुणे (कसबा), पिंपरी-चिंचवड या शहरांनी भाजपाला पराभूत केलेले आहे. भाजपाचा सगळा भर शहरांवर आहे. ग्रामीण भाग उद्धवस्त आहे. निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा मोदी शहा यांची जादू आता िकती उपयोगी पडेल? याचा अर्थ एका पोट निवडणुकीने सगळे निकाल बदलतील, असा नव्हे. पण, शहरांतील मतदारांनाही एका गोष्टीची चाहूल लागलेली आहे भाजपाच्या केंद्रीय राजवटीत लोकशाहीची संपूर्ण व्यवस्था उचकटून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. ‘आम्ही म्हणू ते आणि तसेच’ अशी ही लोकशाहीतून निर्माण झालेली नवी एक व्यक्तीय हुकूमशाही अलगज या देशात अवतरली आहे. नखं बाहेर न काढता अवतरलेली आहे. त्यामुळेच निवृत्त झालेल्या न्यायाधिशांना राज्यपाल खासदार करण्याची युक्ती वापरून सध्याच्या न्यायमूर्तींसमोर…. ‘उद्या तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमचं चाॅकलेट अामच्याकडे आहे….’ हे फार हळूवारपणे पण निश्चितपणे सूचित करण्याची युक्ती वापरली जात आहे. देशातील सगळ्या ख्यातनाम संस्था विकल्या जात आहेत. आता महागाई- बेरोजगारी यापेक्षाही देश उद्धवस्त करण्याचे हे डावपेच सामान्य मतदाराला हळूहळू समजू लागलेले आहेत. माध्यमांचा होणारा वापर, शासकीय यंत्रणांचा होणारा वापर, ई.डी… सी. डी… बीडी… काडी… या संस्थांचा वापर या सगळ्या युक्त्या आता पूर्णपणे उघड्या पडलेल्या आहेत. पुण्यातील मतदाराला हे शहाणपण नक्की आहे… तो जागरूक आहे चिकित्सक वाचकही आहे… माध्यमं बघतो आहे…. ती किती झुकलेली आणि चाटुगिरी करणारी आहेत… हे ही तो पाहतो आहे…. या सगळ्याचा नकळत परिणाम जर पुण्यात झाला तर ग्रामीण भागात तर नक्कीच होणार आहे. कारण ग्रामीण भाग उद्धवस्त होणार आहे. ‘शहरं चकाचक करून, रंगरंगोटी केल्यावर जगातील लोक मुंबई-ठाण्याचे सैांदर्य पाहून तोंडात बोटे घालतील’ ही स्पर्धा ठीक आहे… पण, वृत्तपत्रांत रोज पान-पान जाहिराती देवूनही मतदारांना त्या जाहिरातीचा हेतू कळतो आहे… जाहिरातींनी मते मिळत नाहीत. सभेतील टाळ्यांनी मतं मिळत नाहीत… गटा-गटांच्या नेत्यांना बोलावून, सगळी प्रलोभने दाखवून, ते ते स्थानिक नेते फारसे उपयोगी पडत नाहीत. बेईमानीला तयार होत नाहीत. आणि हुजऱ्यांपुढे नाचत नाहीत. हे ही या निवडुकीने स्पष्ट केले आहे. पोट निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला जायचे नसते. हा संकेत बाजूला ठेवून मुख्यमंत्री शिंदे पुण्यात पोहोचले. लोकांमध्ये मिसळले… दिवसभर चित्रण झाले… त्याचा उद्देश मतदारांवर परिणाम करण्यासाठीच होता. ते सगळं पाण्यात गेलं आहे…
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा : देशातील लोकांना सगळ्यात मोठे समाधान… ही लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये आहे. घटना उद्धवस्त न होऊ देण्यामध्ये आहे. आणि त्यासाठी देशातील सर्वोच्च न्यायालये खंबीरपणे निर्णय घेत आहेत, याचाही ५-१० टक्के परिणाम विचारी माणसांवर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाबाबत जी त्रिसूत्री सर्वोच्च न्यायालयाने अंमलात आणण्याचा आदेश मोदी सरकारला दिलेला आहे. दिला त्यामुळेच या देशातील लोकशाही पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहणार आहे… त्याचा सगळ्यात मोठा आनंद स्वर्गात डॉ. बाबासाहेबांना झालेला असेल. त्यामुळे वातावरण हळूहळू पण, निश्चितपणे बदलते आहे…
कसबाच्या निवडणुकीतील आणखी एक गंमत सांगतो…. त्याचा संदर्भ कार्यकर्ता हुशारीने कसे काम करतो… याच्याशी आहे. पुण्यातील लोकप्रिय नेते अंकुश काकडे हे डावपेचात फार माहीर आहेत… गिरीष बापट यांचे खास मित्र आहेत… पक्ष वेगळे असले तरी महाराष्ट्रात मैत्रीत दृष्टपणा केला जात नाही… हा संस्कार जनसंघापासून बापट यांनी जपला आणि काकडे यांच्या रक्तातच तो आहे…. अंकुश काकडे यांच्या मनात आले की, गिरीष बापट यांना मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजता गेले…. तर समाज माध्यमे ‘भाजपाचे खासदार बापट ९ वाजता मतदान केंद्रावर’ हे सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत बापट यांनी मतदान केले, हे दाखवत बसतील….’ श्री. काकडे बापट यांच्या घरी गेले.. ‘सकाळी गर्दी कशी असते तुम्हाला त्रास होईल… संध्याकाळी मतदान करा… ’ अशी त्यांनी विनंती केली. आणि गिरीष बापट यांनी पाच वाजता मतदान केले.
थोडेसे डोकं चालवून राजकीय कार्यकर्ता काम करेल तर, समाज माध्यमांच्या गराड्यातूनही युक्तीनं ठळक होणाऱ्या बातम्यांना कसं टाळू शकतो, याचा नमूना म्हणजे हा किस्सा आहे.
आणखी एक…. काँग्रेसच्या विजयी उमेदवारानेही किती चांगला निर्णय केला…. विजयी झाल्यानंतर श्री. गिरीष बापट यांच्या घरी जावून त्यांना वाकून नमस्कार केला… त्यांचे आशिर्वाद घेतले… आजारी असलेल्या बापट यांनी तितक्याच मनाच्या मोठेपणाने त्यांना भरभरून आशिर्वाद दिले… त्या क्षणाला असे वाटले की, वाजपेयी, आडवाणी, गडकरी, उत्तमराव पाटील यांचा भाजपा महाराष्ट्रात पुन्हा जन्मला आहे. आजच्या भाजपाच्या उंडारलेल्या सत्ताधाऱ्यांना हा संस्कार आणि त्यातील मनाचा मोठेपणा कधीतरी समजू शकेल का? पराभव का होतोय या कारणात या आजच्या भाजपा नेत्यांचा उद्दामपणाही फार कारणीभूत आहे.
१९९१ साली काँग्रेसचे उमेदवार वसंत थोरात विजयी झाले होते… ३२ वर्षांनंतर… असं ‘कसं… बा…’ आणि का? हा प्रश्न मनात येतो. पण त्याचे उत्तर मतदारांनी दिले आहे… सध्या एवढेच…
मधुकर भावे ,जेष्ठ पत्रकार