दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाने वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. सरकार त्यांच्या न्याय हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल, तर आपण लढा देऊ; परंतु स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी. अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिक संघांचे शिरूर तालुका अध्यक्ष नामदेव गिरमकर यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची शिरूर तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला. मनोज जरांगे यांच्याशी जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नामदेव गिरमकर, उपाध्यक्ष रामदास काळे, उरळगाव तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम महाराज गिरमकर,जेष्ठ नागरिक संघांचे सहयोगी सदस्य जन्याबापू काळे यांनी चर्चा करून तेथे उपस्थित कार्यकर्त्यांस मार्गदर्शनही केले.मनोज जरांगे पाटील यांनी पुढील रणनीती संदर्भात मार्गदर्शन केले.
उरळगावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम महाराज गिरमकर म्हणाले की मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी लाठीहल्ल्याची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. त्यासाठी कितीही मोठा लढा द्यावा लागला, तर समाजबांधव तो देईल. मात्र, सरकारनेही या विषयाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे.
माझी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. स्वतःच्या जीविताची काळजी मराठा बांधवांनी घ्यावी. कोणतेही टोकाचे पाऊल समाज बांधवांनी उचलू नये. असे आवाहन जेष्ठ नागरिक संघांचे उपाध्यक्ष रामदास काळे यांनी केले.