दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यावरुन देशातील विरोधी पक्षांमध्ये चर्चासत्र सुरु असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास नकार दिला आहे.
एकीकडे भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी आज नवी दिल्लीमध्ये विरोधकांची बैठकही आयोजित केली केली होती.
या बैठकी दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास नकार दिला असला तरी सुद्धा पवार यांनीच राष्ट्रपदीपदाची निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, ‘केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा.’ अशी भूमिका देसाई यांनी शिवसेनेमार्फत मांडली.
दरम्यान, आज भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांना आमंत्रित केले होते. ममता बॅनर्जी यांच्या हाकेला प्रतिसाद देत १७ विरोधी पक्षांनी हजेरी लावली. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या विरोधीपक्षाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भूषविलं.
या बैठकीस माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जून खरगे( काँग्रेस), अखिलेश यादव ( उत्तर प्रदेश), मेहबुबा मुफ्ती( काश्मीर), सुभाष देसाई( महाराष्ट्र), ई करीम (केरळ), जयराम रमेश (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), टी.आर.बालू (तामिळनाडू), यशवंत सिन्हा (बिहार), रणदीप सुरजेवाला (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), राजा (तामिळनाडू) आदी १८ नेते उपस्थित होते.
या विरोधकांच्या बैठकीमध्ये, भाजपने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने ७५ वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशावेळी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा अशी चर्चा झाली. तसंच भाजपा विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहीजे.
शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा, हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची असल्याची भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.