दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील नागरी वस्त्यांना आवश्यक अशा मूलभूत सुविधा न पुरविता महापालिका प्रशासन फक्त टॅक्स वसूल करायचं तेवढं काम करतेय, करदात्या नागरिकांना हक्काच्या सोयी सुविधा न पुरविता किंबहुना मानवतेच्या दृष्टीने कर्तव्य न पार पाडता त्यांची पिळवणूक केल्यास सहन केले जाणार नाही, अशी घणाघाती टीका परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली.
कारेगाव रोडलगतच्या क्रांती नगर परिसरात कच्च्या रस्त्याची सुधारणा करुन त्यावर खडीकरण आणि डांबरीकरणासाठीच्या रस्त्याचे उद्घाटन आ. राहूल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सुमारे तेवीस लाख रुपयांची लागत लावून सदर रस्त्याचा विकास आमदार फंडातून केला जाणार आहे.
सुमारे पस्तीस वर्षांपासूनची ही वसाहत आहे. मागील कालावधीत या वस्तीतील नागरिकांना रहदारी साठी खूप त्रास सहन करावा लागत होता, त्याचा हा त्रास नाहिसा करण्यासाठी आमदाराकीचे पालकत्व स्वीकारलेल्या राहूल पाटील यांनी आपले कर्तव्य पूर्णत्वास नेल्यामुळे तेथील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत त्यांचा यथोचित सन्मानही केला आहे.
महापालिका क्षेत्रात असूनही सुविधांचा अभाव आणि करांची वसूली मात्र सक्तीने केली जाते. पालकत्वाची खरी जबाबदारी तर मनपाचीच आहे परंतु ती पार पाडली जात नाही. त्याचाच परिपाक म्हणून मनपाच्या निस्क्रयतेमुळे नागरिकांना होणारा त्रास लोक प्रतिनिधी म्हणून पर्यायाने कार्यरत सर्वांनाच सहन करावा लागतो, अशी खंतही व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
२५ नगरसेवक निवडून आणणार
—————————————-
आगामी मनपा निवडणुकीत शिवसेना अधिकाधिक उमेदवार रिंगणात उतरवून किमान २५ नगरसेवक तरी निवडून आणल्याशिवाय राहाणार नाही, असंही श्री पाटील म्हणाले. त्यामुळे समस्त शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असलेले असून लवकरच याविषयीची आखनी व रणनिती आखली जाईल असेच दिसून येत आहे. तसे झाल्यास परभणी महापालिकेतील सत्तेच्या चाव्या शिवसेच्याच हाती राहू शकतील का ? हे येणारा काळच ठरवेल.