दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मायाजाळ आणि हेवेदाव्याने भरलेल्या या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जर कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर गरज आहे भगवंत श्रीकृष्ण यांच्या आदर्शाची, विचारांची आणि त्यांनी सांगितलेल्या पथावर मार्गक्रमण करण्याची. कारण की जगात मानवाच्याच वाट्याला सुखःदुख येतात आणि इतरांच्या येत नाहीत हा भ्रम आहे. भगवान श्रीकृष्णा इतके सुख दुःख हे कोणत्याही व्यक्तीच्या वाट्याला आले नाहीत. उदाहरणार्थ ःजन्म तुरुंगात आणि जन्म झाल्याबरोबर खर्या आईला सोडून दुर जावे लागले दुर गेल्यानंतरही जन्मल्यापासूनच दुरवरती गोकुळामध्ये येवून दैत्य-दानव जिवावर उठत मारण्याचा प्रयत्न करु लागले तेथेही भगवतांनी आलेल्या संकटांना नष्ट करुन विजय मिळविला. पुढे प्रेम भेटले ते राधेचे तिला कायमचे सोडून मथुरेला दुष्ट कंसमामाचा वध करावयास जावे लागले तेथे मामाला मारले पण कोणताही मोह जवळ न बाळगता मथुरा सोडून दुरवर द्वारका नगरी वसवत स्वतःचे राज्य निर्माण केले. त्यामुळे कोणाचीही संपत्ती हडप करु नये हा देखील आदर्श जनांच्या समोर मांडला. पुढे नाते जपत असतांना सत्याची बाजू घेवून आत्याची मुले पांडवांना अनेक संकटातून वाचवले. द्रौपदीचे वस्त्रहरण कौरवांकडून होतांना एक भाऊ म्हणून भावाचे कर्तव्य निभवतांना द्रौपदीचे वस्त्रहरण होवू दिले नाही. पुढे युद्ध जिंकण्यासाठी हतबल झालेल्या आणि आप्तजनांच्या गुरुजनांच्या नातेसंबंधामध्ये भावनिक झालेल्या अर्जुनाला युद्धात उतरविण्यासाठी भगवतगीता सांगितली ज्यामध्ये अर्जुनासह भविष्यातील जन्म घेणार्या मानवजातीला प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने ज्ञानबोध घेवून कर्तव्य कसे निभवावे, कोणाशी कसे वागावे, आपण खरे आहोत तर तमा कशाची बाळगावी, ज्ञान काय, जन्म काय, विधी काय, मृृत्यू काय, आत्मा हा अमर असून त्याला मृत्यू कधी येत नाही यासोबत अनेक उदाहरणे देता येतील याचा सारांश या भगवद गीता नावाच्या एका ग्रंथात प्रभू श्रीकृष्णांनी दिला आहे पुढे युद्ध जिंकून दिल्यानंतरही दोष भगवान श्रीकृष्णाला गांधारीने दिला व श्राप देखील दिला त्यामुळे चांगले वागणार्या व्यक्तीला सतत अग्नीपरीक्षा द्याव्या लागतात आणि दुःख त्याच्याच वाट्याला येते हे भगवान श्रीकृष्णाच्या जिवनपटावरुन दर्शविल्या जाते. इतके झाल्यानंतरही दक्षिणेत रुक्मीणीच्या मागे येवून कलियुगात कलीला पाताळी गाडून पुढे विठ्ठल बनवून दुष्ट शक्तीला संदेश दिला की जे माझे नाव घेतील त्यांना आजही कलीची छाया देखील काही बिघडवू शकणार नाही त्यामुळे कलीयुग या एकाच युगात काय तर भगवान श्रीकृष्ण 28 युगे भक्तांची मदत करणारा देव राहिला आहे. त्यामुळे नीती-ज्ञान भांडाराचा रचियेता भगवान श्रीकृष्ण यांचा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण हा एकच मंत्र भक्तगणांना संकटापासून दुर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल ही मात्र ठाम अशी शाश्वती.
हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
या नामातच इतकी प्रचंड गोडी आहे की साक्षात तहान, भुक विसरुन फक्त भगवान श्रीकृष्णाचे नामजप करावा असं वाटावं इतकी विलक्षण महती या नामाची आहे .साक्षात शुरवीर, ज्ञान भांडार, प्रेमाचे भांडार, कर्तव्य पालक धर्मरक्षक आणि सर्व भौतिक नाते संबंध ज्ञान मार्गावरून प्रभावी पणे सांभाळताना आणि देव असुन मानवी जीवन जगत असताना कुरूक्षेत्रावर युद्ध सुरु होताच कोणासाठीही न थांबत असलेल्या वेळेला देखील थांबवून पार्थ धर्नुधर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता जगासाठी प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक नातं अगदी सचोटीने प्रमाणिक आणि न्याय पुर्ण निभवताना परिपुर्ण पुरूष होण्याचं भाग्य लाभलं ते भगवान कृष्ण यांना मानवी जीवन जगत आई वडील यांच्या छळाचा बदला घेतला , अनेक दुष्ट राक्षसांचा वध केला ,बाल लिला केल्या , धर्म-अधर्माचे युद्ध रचलं, इतकेच नाही तर तेही जिंकून दिलं आणि त्यामध्ये नितीच्या बळावर धर्माचा विजय घडवला. बहीणीच नातं म्हणुन पांचाली द्रौपदीचे अब्रुरक्षण केले, सुदामाचे मित्र प्रेम सांभाळले, भगवत गीता ज्ञान प्रकट केले, पत्नी म्हणून रुक्मीणी-सत्यभामा यांना योग्य न्याय दिला तर प्रेमिका म्हणून राधेला न्याय दिला पतीधर्म म्हणून पारिजातक फुल आणण्यासाठी देव इंद्रांशी युद्ध केले व पत्नीचा हट्ट पुरवुन तिला पारिजातक स्वर्गातून आणून दिले. बंधु म्हणून बलराम मोठया भावाचा मान यथायोग्य दिला. एकंदरीत सगळ्या नातेसंबंधात अगदी जबाबदारीने भुमिका अदा करून शेवटी ‘द्वारकाधीश’ म्हणून जनतेचे कल्याण केले आणि ज्ञान व भौतिक नातेसंबंध तसेच जीवनात येणार्या सुख दुःखांचा मेळ लावत-लावत जीवन पुर्णत्वास न्यावं यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे होय.
अशा या भगवान श्रीकृष्ण यांना जन्माष्टमी निमित्त सादर प्रणाम.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व
लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301