दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील चांगापूर-वलगाव-पूर्णानगर या मार्गावरचा रस्ता संपूर्णतः खड्डेमय झाल्यामुळे प्रवासी जीव मुठीत धरून आपला प्रवास या खड्डेमय रस्त्यावरून करीत आहेत.या मार्गावर बऱ्याच नागरिकांचा अपघात झाला असून प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांची दखल कधी घेणार?प्रशासन जीव गेल्यावर पाणी पाजनार की काय?नागरिकांच्या जीवाशी खेळ कधी संपुष्टात आणण्याचा प्रशासन प्रयत्न करेल?असे प्रश्न आता नागरिकांना पडू लागले आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगापूर-वलगाव-पूर्णानगर मार्गावरील रस्ता हा खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.कोणत्याच अधिकारी वर्गाने संबंधीत विषयी दखल न घेतल्यामुळे १७ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती कार्यालय येथे शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ५ दिवसाचा अल्टीमेटम देऊन चांगापूर-वलगाव-पूर्णानगर मार्गाची सुधारणा करण्याकरिता लवकरात-लवकर मंजुरी द्यावी.अपघातास निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची तात्काळ दखल घ्यावी व नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोई टाळाव्या असे यावेळी जिल्हाध्यक्ष वसू महाराज यांनी कारवाईचे करण्याचे आदेश मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले.दिलेल्या निवेदनावर योग्य कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.निवेदन देतेवेळी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.