दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी पैलवान व्यंकटराव शिंदे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी व जोशात आनंदोत्सव साजरा केला.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात सर्वत्र संघटना बांधणी व पदाधिकारी यांच्या नियुक्त्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच अनुषंगाने उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तटबंदी असलेल्या बाले किल्ल्यात शिंदे गटाला शिरकाव करण्याची कुठेही संधी मिळणार नाही असे वाटत असतांनाच एका पाठोपाठ एक अशा नवनवीन नियुक्त्या होतांना दिसत आहे.
नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आमदार भरत शेठ गोगावले व आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत पैलवान व्यंकटराव शिंदे यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याचे घोषित केले. त्यावेळी श्रीयुत मुंढे व नगरसेवक रामभाऊ कदम हे सुध्दा आवर्जून हजर होते.
राज्यात सर्वत्र पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन संघटन बांधणीला जोर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाठोपाठ एक असे जिल्हे (किल्ले) काबिज कसे करता येतील याचे मनसुबे रचण्यात गनिमी काव्याने अधिकच भर दिला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद पासून जिल्हे सर करण्याची जी मोहीम सुरु केली आहे ती जालना, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड नंतर आता परभणीत येऊन ठेपली आहे. अभेद्य बालेकिल्ला समजले जाणा-या परभणीतही सततच्या नियुक्त्यांमुळे आता ब-यापैकी सुरुंग लागत असल्याची चर्चा आता प्रत्येक नुक्कडवर होतांना दिसत आहे. पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती बळीराम कदम, ………., माजी खासदार ॲड. सुरेश जाधव, भास्करराव लंगोटे आणि आता पैलवान व्यंकटराव शिंदे यांनी व त्यांच्या असंख्य समर्थकांनी मूळ पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धडलेसे केलेले प्रवेश बरेच कांही सांगून जात आहेत. सर्वांगीण विकासापासून गेली अनेक वर्षे वंचित राहिलेला निजामकालीन परभणी जिल्हा आता तरी सुधारला जाईल अशी खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निश्चितच लागली जाणे स्वाभाविक आहे. मुंगीच्या रुपाने एकेक करून बाहेर पडणाऱ्या त्या कधी मोठ्या संख्येत होतील व भले मोठे वारुळ बनवतील यांचा थांगपत्ताही कोणाला लागू देणार नाहीत हे न सांगता येणारेच असू शकेल. प्रत्येक जिल्ह्याचा किल्ला मजबूत राखणे शक्य व्हावे, मावळे व सरदारांना भक्कमपणे सज्ज राहाता यावे, गनिमी कावा साधता यावा यासाठी लवकरच जिल्ह्या जिल्ह्यात प्रशस्त अशी कार्यालये उभारली जाणार असल्याचे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे येणारा काळच दाखवून देईल की, परभणी सह मराठवाड्याचा आराखडा नेमका कसा राहील, समजल्याशिवाय राहाणारे नाही असे शिंदे गटाच्या शिवसैनिकांना वाटणे स्वाभाविकच आहे.