दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांचा पुढाकार
भूम:-उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेले पर्यावरणप्रेमी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड चळवळीसाठी हाडोंग्री (ता.भूम) येथील त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी गावातील भगवंत विद्यालय, पर्यावरण व वन्यजीव संवर्धन केंद्र आणि पुरातन महादेव मंदिर शिवकडा परिसरात तब्बल 15 हजार झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज (दि.20) जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने भगवंत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.धोंगडे सर, कोषाध्यक्ष मुक्ताप्पा तळेकर, सहसचिव श्री.डोरले, हाडोंग्रीचे सरपंच सुधीर क्षीरसागर, सदस्य रविंद्र लोमटे यांच्यासह भूम, वाशी, कळंब तालुक्यातील पर्यावरणप्रेमी नागरिक, हाडोंग्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षलागवडीची चळवळ वाढली पाहिजे – हाडोंग्रीकर
यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर म्हणाले की, बदलत्या निसर्गचक्रामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जोपासण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. हाडोंग्री गावासह भूम तालुक्यात आतापर्यंत आम्ही 75 हजार वृक्षलागवड केलेली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी 15 हजार रोपे उपलब्ध करुन दिली आहेत. या रोपांची भगवंत विद्यालय, ध्यान केंद्र व पुरातन महादेव मंदिर परिसरात लागवड करण्याचा शुभारंभ केला असल्याचे सांगून वृक्षलागवडीची चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे असे सांगितले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षचळवळ – पोलीस अधीक्षक कुलकर्णी
उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर येथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली असता कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी असे चित्र असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यासाठी पोलीस दलाच्या पुढाकारातून चळवळ उभारली आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांसह इतर ठिकाणी वृक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद चांगला मिळाला असून हाडोंग्रीकर यांच्या पुढाकाराने आज मोठ्या प्रमाणात 15 हजार वृक्षांची लागवड होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
विविध औषधी वनस्पतींसह फळझाडांचा समावेश
वृक्षारोपणासाठी हिरडा, बेहडा, अर्जुन, सादोडा, रिठा, बेल, बांबू, कवठ, इंग्रजी चिंच, आवळा, कडुनिंब यासारख्या औषधी वनस्पतीसह विविध फळझाडांच्या रोपांचा समावेश करण्यात आलेला आहे. गेल्या तीन वर्षात 75 हजार रोपांची लागवड केलेली असून आपण सव्वालाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी सांगितले.