दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुंबईला दहशतवादी हल्ल्याची आलेली धमकी सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे. याबाबतीत केंद्रापासून सर्वच यंत्रणांनी लक्ष घालायला हवं. आपली पोलीस यंत्रणा यासाठी सक्षम आहे.
या धमक्यांचा मागे नेमकी कोणती शक्ती आहे. ही धमकी दहशतवाद्यांकडून आली आहे की अजून कुठून हे सरकारी यंत्रणांनी तपासायला हवं असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅपवर मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करू अशी धमकी देणारे मेसेज आले आहेत. सहा दहाशतवादी मुंबईवर या हल्ल्यासाठी तयार असल्याचे या संदेशात म्हटले आहे. या संदेशांची तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते.
यावेळी त्यांनी यवतमाळमधील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. यवतमाळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध न होवू शकल्याने आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. यात त्या महिलेच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही धक्कादायक घटना घडली.
याबाबत पवार म्हणाले की, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला. मात्र यवतमाळ मध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं. या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन आम्ही सर्व विरोधक हा मुद्दा अधिवेशनात मांडू. तसेच सरकारलाही त्याची नोंद घ्यायला लावू. अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याबद्दलची खबरदारी घ्यायला हवी. असे ते म्हणाले.