दैनिक चालु वार्ता उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
स्वप्नातही कधी कोणी विचार केला नसेल. एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडतील अन् राज्याचे तेच मुख्यमंत्रीही बनतील ? पण झाले, तेच मुख्यमंत्री बनले अन् ज्यांच्या सोबत मागील अडीच वर्षे मांडीला मांडी लावून सत्तेत बसले होते, त्या मविआतील कॉंग्रेस, राष्ट्रवादीला नव्हे नव्हे ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत होते, ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सुध्दा काहीच कळले नव्हते. सर्वांच्याच भूवया कमालीच्या उंचावल्या गेल्या हेही थोडे थोडके नसे.
भाजपाच्या मदतीने पक्ष फोडणे व दुसरे सरकार बनविण्याची जी खेळी मागील काही महिन्यांपासून अत्यंत गुप्तपणे सुरु होती, त्याची खबरदारी मात्र एकनाथ शिंदे व त्यांची टिम आणि भाजपा यांनी घेतली होती, ती कोणालाच कशी कळली नसावी. अगदी राजकारणातले मुरब्बी, मुत्सद्दी आणि डाव पेच खेळण्यासाठी सही सलामत निसटता यावे यांची संपूर्ण अंडी फिरवली अवगत असणारे व तेल लावलेले पैलवान म्हणून ख्याती असलेले शरद पवारही यापासून कसे अनभिज्ञ राहिले असावेत हा खरा प्रश्न आहे. एवढंच नाही तर अमेरिकेशी तोडीस तोड म्हणून एके काळी गाजलेली मुंबई शहरातील गुप्तचर यंत्रणा एवढी नावाजलेली परंतु ती यंत्रणा सुध्दा एवढी कशी काय गाफिल राहिली असावी, हा सुध्दा संशोधनाचाच भाग नाही का ?
अचानक मुख्यमंत्री बनले गेलेले एकनाथ शिंदे बघता बघता राज्यभर सर्वांना समजायला लागले. कित्येकांना तर ते भाषण कसे करतात, त्यांचा आवाज कसा आहे, ते काय करु शकतील या सारख्या गोष्टींपासून अनेकजण अनभिषिक्त असेच होते. तथापि त्या सगळ्या तर्क वितर्कांवर मात करुन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे अवघ्या महाराष्ट्रभर छा गये असेच झाले. त्यांनी तब्बल ४० आमदार फोडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबरी धक्का दिला. महाराष्ट्रातील सत्तेचे भिष्माचार्य शरद पवार यांनाही आणि कोणताही थांगपत्ता लागू दिला नाही, हे सुध्दा न उलगडणारे कोडे म्हणावे की सगळ्याच धूर्त राजकारणी मंडळींना बूचकळ्यात टाकणारे खरे राजकीय महर्षि हे एकनाथ शिंदे हेच ठरले म्हणावे की काय, असेच चित्र निर्माण झाले आहे. कधी नव्हे ते आणि आजतागायत कोणीच स्वपक्षाचे एवढे आणि अपक्ष व मित्र पक्षाचेही एवढे आमदार फोडण्याचे धाडस कोणी केले नाही किंवा ते कोणालाच जमलेली नाही असं म्हटलं तर हास्यास्पद तर नक्कीच नाही.
राज्यातील सर्व राजकीय व गुप्तचर यंत्रणांवर मात करुन शिंदेंच्या एकनाथांचा वारु गुजरात मार्गे थेट गुवाहाटी येथे अगदी सुखरुप पोहोचल्या. तसा गुजरातची बॉर्डर वापी येथे तो अडवण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु तोही प्रयत्न कुचकामी ठरला गेला असं म्हटलं तर चुकीचं ठरु नये. अडवणार तरी कसा, त्यासाठी भाजपाच्या दिल्लीच्या धनी पुरता बंदोबस्त जागोजागी तैनात केला होता. जेथे जेथे अडथळा येईल तेथे तेथे भाजपाचे मातब्बर मंडळी धावून जाईल अशी चोख व्यवस्था केली गेली होती. एकनाथ शिंदे आणि टीमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या बटालियन्स केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी तैनात ठेवल्याचे बोलले जात होते.
गुवाहाटी येथे राहाण्याची सोय एका आलिशान हॉटेलात कोणी व कशी केली हे सुध्दा लपून राहिलेले नव्हते. का ते सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज पडली नाही. सुग्रास भोजन, राजकीय घडामोडींवर विलक्षण चर्चा, गंभीर पण सखोल विचार मंथन यासारखी रेलचेल साधारण महिनाभर तरी चालली असावी. परंतु यांच्यापेक्षा अधिक घालमेल महाराष्ट्राती इत्तर राजकीय मंडळींचीच जास्त होतांना दिसून येत होती. कारण अगदी पक्ष फोडणे, गनिमी काव्याने वाटचाल करणे, कोणताही धोका होणार नाही असे स्थलांतर करणे व सत्ता स्थापन होईपर्यंत कोणताही दगा फटका होणार नाही याची पुरेपूर काळजी केंद्रीय व राज्य भाजपाने अगदी परिपूर्ण घेतली होती असेच प्रत्येक हालचालीतून दिसत होते. दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वसनीय व राजकीय सल्लागार मिलींद नार्वेकर व पालघरचे संपर्क नेते आ. रवींद्र फाटक हे दोन शिल्लेदार एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांची समजूत घालतील की काय, शिंदे यांचा डाव उधळतील की काय असेही वाटले होते. अनेकांनी तशा वावड्या ही उडवल्या होत्या परंतु त्या निष्फळ ठरल्याचे कालांतराने दिसून आले.
सरकार कधी व कसं बनलं जाईल याची पुरेपूर काळजी घेत एकदाची पुढची रणनीती ठरली म्हणजे गुवाहाटी येथे मज्जेत असलेलं शिंदे यांचं सैन्यदल प्रथम गोवा मुक्कामी व नंतर मुंबईला अगदी कडेकोट बंदोबस्तात आणले गेले. मुंबई विमानतळ ते विधान भवन हा प्रवास तसा सगळ्यांच्याच जिकीरीचा होता तथापि तो सुध्दा अगदी निर्विघ्नपणे सुरक्षित पार पडला, शेवटी एकदाचा यशस्वी ठरला अन् सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. याचे एकमेव कारण म्हणजे मधल्या काळात जे गद्दार पलायन करुन गेले आहेत, ज्यांनी धोका दिला आहे, सरकार पाडले आहे, त्यांनी मुंबईत परत येवून दाखवावेच या व असे अनेक धमकीवजा इशारे त्यांना दिले जायचे. अपशब्द व असयुंक्तीक शब्दांचा मारा सतत होता. काही वेळा तर परिवारांनाही दु:आ होऊ शकेल असे शब्दप्रयोग केले गेले त्यामुळे शिंदे व त्यांच्या टीम मधील घाबरले जातील अशी अनेकांना भीती होती परंतु विद्यमान काळापर्यंत तरी तशी भीती बाळगावी लागेल अशी समयसूचकता नसल्याचे दिसत आहे. सरकार स्थापन होऊन प्रथम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या दोघांनीच साधारण महिनाभर राज्याच्या राजकारणाचा गाडा हाकण्याचे काम केले. मधल्या काळात निसर्गही बराच कोपला होता. अति पर्जन्यवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले. असह्य असे बरेच नुकसानदायी प्रकार घडले. परिणामी काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांचे संसार व परिवार उघड्यावर पडले. सारख्या अनेक दुर्दैवी घटना निसर्ग कोपामुळे झाल्या. एका बाजूला राजकीय दोलायमान परिस्थिती तर दुसरीकडे अति पर्जन्यवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि सत्तेचा सारीपाट टिकवतांना लढावी लागत असलेली कायदेविषयक लढाई या तिहेरी चक्रव्युहात सापडलेलं शिंदे सरकार काडीमात्र न डगमगता उभय मंत्र्यांनी जेथे जेथे आवश्यक आहे, तेथे तेथे पाहणी दौरे करुन विस्थापित व आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटी देऊन त्यांचे सांत्वन एका बाजूला तर दुसरीकडे झालेले नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामे करण्याचे काम त्यांनी युध्दपातळीवर सुरुच ठेवले व सोबत समस्त शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे काम केले. राज्यातल्या दु:खाणी हातोटी हाताळताना शिंदे सरकारने एक प्रकारे काम करण्याची सच्चोटी ती काय असते हे दाखवून दिले.
शिंदे सरकारची ही सत्ता राहाते का जाते, हा भाग वेगळा आहे परंतु कर्तव्यात कोणतीही कसूर आणि निष्काळजीपणा नसावा. याची काळजी घेत हे सरकार नेटाने काम करीत आहे असाच सूर विरोधकांकडून नव्हे तर समस्त शेतकरी, व्यापारी वर्गातून ऐकावयास मिळत आहे एवढं नक्की. राहता राहिला तो प्रश्न सत्ता राहिली का जाईल याचा. कायदेविषयक लढाई माननीय सर्वोच्च न्यायालयात सुरुच आहे. शिवाय अन्य मार्गाने चालणारी लढाई सुध्दा शिंदे सरकार व टीम त्यांच्या पध्दतीने विविध मार्गांनी हाताळत आहेत. न्यायदेवता जो निर्णय देईल तो सर्वांनाच बंधनकारक राहील यात शंकाच नाही. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायदेविषयक व अन्य सर्व लढाईतून नव्हे विविध अडचणींच्या महासागरातून अगदी सही सलामत विजयी होतील असा विश्वास त्यांना नक्कीच असू शकेल. घोडा मैदान जवळच आहे, जय पराजय ह्या बाबी कोणाला तरी स्वीकारावाच लागणार आहे मग तो एकनाथ शिंदे यांचा होईल किंवा उध्दव ठाकरे यांचा, येणारा काळच दाखवून देईल एवढं खरं !
जयंतराव यांना हे सारं जमलं असतं का ?
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
राष्ट्रवादीचे नेते जयंतराव यांनी ज्या आत्मविश्वासाने वक्तव्य केले आहे की, हे मला अगोदरच सांगितले असते तर मी ही करेक्ट कार्यक्रम केला असता. जयंतराव यांच्याया धाडसाचं खरं तर प्रथमतः अभिनंदन करायला हरकत नाही परंतु ज्या जयंतरावांनी कितीही आव आणला, रुसवे ,फुगवे केले तरी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदही मिळवता आले नाही तेथे मुख्यमंत्री पद तर दूरच. अहो, जयंतराव राष्ट्रवादीचं पद सांभाळताना एखादा निर्णय घेणे आवश्यक असलं तरी तो तुम्ही स्वतःच्या मनाने घेऊ शकत नाहीत. माननीय शरद पवार साहेब, अजित दादा पवार आणि का. सुप्रियाताई सुळे विचारल्याशिवाय किंवा त्यांची मान्यता असल्याशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही, बोलू शकत नाही. मग एकनाथ शिंदे यांनी घेतलेला तो कोणताही धाडशी निर्णय असो ,तसा तुम्ही तुमच्या मनाने घेतला असता काय ? पक्ष सोडून जाण्याची साधी भाषाही तुम्ही करु शकत नाही तेथे मुख्यमंत्री तुम्ही कसे बनले असते, तुम्हाला कोणी तरी बनायला दिले असते का ? हा खरा सवाल आहे.
कधी नव्हे एवढे आणि आजतागायत कोणीच करु शकले नाही असे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फोडून त्यांना एवढे दिवस सुरक्षित स्थळी ठेवणे व आणणे हे काम एकनाथ शिंदे यांनी ज्या हिमतीने केले आहे, ती हिम्मत तुम्ही दाखवू शकला असता काय ? मोठे पवार साहेब तर सोडाच परंतु धाकल्या पवार साहेबांनीच अशा कृत्याबद्दल काय ॲक्शन तुमच्यावर घेतली असती ती तुम्हालाही कळली नसती, असं आम्ही नाही तर अनेक पक्षांतील बरेच दिग्गज बोलत आहेत. तुम्ही पक्ष फोडताना किती आमदार सोबत नेऊ कले असते, यांचा साधा आकडा सांगून बघा, तुमच्यावर काय पाळी येईल ते काळच दाखवून देईल यांचे स्मरण ठेवले. तर वावगे ठरणार नाही. मंत्री मंडळात समावेश झाल्यास खातं कोणतं घ्यावं, हे तुमच्या हातात नाही तेथे मुख्यमंत्री बनतं व सरकार बनवणं तर लांबच राहिलं.
एकनाथ शिंदे दिसायला साधे असले अन् तुमच्या गावाकडचेच असले तरी त्यांनी लहानपणापासूनच वाघाबरोबर काम केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाची अन् धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचे गाठोडे त्यांनी सदैव शिदोरी पाठीशी बांधले व त्यांचेच अनुकरण केले आहे. त्याचीच परिणीती म्हणून त्यांच्या अंगात १०० हत्तीचे बळ निर्माण झाले असल्यास नवल वाटू नये. वाघाच्या बिळात वाढलेलं पिल्लू हे धाडशी व कोणालाही अगदी मृत्युला ही न घाबरणारेच असते मग तुम्हाला तशी कोणती शिकवण मिळाली आहे, ज्यामुळे तुम्ही पवार कुटुंबियांना डावलून वा त्यांना अंधारात ठेवून कोणताही असा निर्णय घेतला असता. आपल्याकडे कमालीची धन व संपती असेलही परंतु जो गनिमी कावा नि हिम्मत लागते, ती मात्र नसल्याने यापैकी कोणताही निर्णय तुम्ही नेत्यांना डावलून वा अंधारात ठेवून घेऊ शकत नाही एवढे खरे. आपणही धुर्त, मुत्सद्दी वा डॅशींग नेते म्हणून निश्चितच असाल, त्यात शंकाही नसेल परंतु एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय छातीची ढाल करून घेतले आहेत ते अंमलातही आणून दाखविले आहेत, तसे तुम्ही काय काय करु शकता, यांचे अवलोकन केले म्हणजे पूरते लक्षात येईल. एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं आहे, करुन दाखवलं आहे व भविष्यातही जे काही करतील ते दिसणारच आहे, त्यांची चर्चा केवळ आणि केवळ महाराष्ट्र व भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगभर होते आहे. हे मुळीच विसरुन चालणारे नाही. आपण महाराष्ट्राच्याच राजकारणात आणि कुठे आहेत, याचा जरी विचार केला तरी पुरे !
तूर्त पूरे पण क्षमस्व म्हणायला मला मुळीच काही वाटणार नाही.