दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
अखेर आदिवासी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू
जव्हार: जव्हार,विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यातील इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप अकरावीत प्रवेश मिळालेला नसल्याने जिजाऊ संघटना आक्रमक झाली होती.१२ सप्टेंबर पासून प्रकल्प कार्यालय जव्हार येथे जि.प.सदस्य संदेश ढोणे,जिजाऊ पालघर जिल्हाध्यक्ष रवींद्र खुताडे,तालुका अध्यक्ष मधुकर पवार,मोखाडा अध्यक्ष रोहित चक्रवर्ती,गणेश रजपूत,सुरेश लहारे यांच्या उपस्थितीत पालक आणि विद्यार्थ्यांसहित आमरण उपोषणाला सुरवात केली होती.जोपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार जिजाऊ संघटनेने केलेला होता.सविस्तर वृत्त असे की नामांकित शाळांमधून दहावीत उत्तीर्ण झालेल्या २७८ विद्यार्थी अद्यापही अकरावी प्रवेशा पासून वंचित राहिलेले होते.याविषयी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिजाऊने प्रवेश करून देण्याची मागणी केली होती.प्रकल्प अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देऊनही दहा दिवस उलटून गेल्याने संघटनेने प्रकल्प कार्यालया समोरच उपोषणाचे हत्यार उपसले होते.
या आदिवासी विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा यासाठी जिजाऊ संघटनेने २९ ऑगस्टला आंदोलन केले होते.प्रकल्प अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून दिला जाईल अशी लेखी ग्वाही जिजाऊला दिलेली होती.त्यामुळे जिजाऊने त्यावेळी आपल्या आंदोलनाला त्यावेळी स्थगिती दिली.मात्र दहा दिवस होऊन गेल्यावरही या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती.त्यामुळे १२ सप्टेंबर पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोरच जिजाऊ संघटनेने पालक व विद्यार्थीसहित आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती.जिजाऊच्या या आमरण उपोषणाची प्रकल्प कार्यालयाने दखल घेऊन या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आल्याने मोठा दिलासा या विद्यार्थ्यांना मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांनी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
या आदिवासी विद्यार्थ्यांचे पूर्ण प्रवेश होई पर्यंत आमचा लढा सुरूच राहील..
जव्हार तालुका प्रमुख
मधुकर पवार
जिजाऊ संघटना