दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
सरपंच पदाच्या थेट निवडणुकीने रंगत
जव्हार:- गेल्या वर्षभरापूर्वी जव्हार तालुक्यातील मुदत संपलेल्या ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतात सर्वच राजकीय पक्षाकडून सध्या तालुकानिहाय बैठका घेऊन उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे.यंदाच्या या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक असल्याने निवडणुकीला आणखीनच रंगत येणार असल्याचे चित्र आहे.२१ ते २७ सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १३ ऑक्टोबरला प्रत्येक्ष मतदान होणार आहे तर १४ ऑक्टोंबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळी आधीच ग्रामपंचायतीचे फटाके फुटणार आहेत.
यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्य मधूनच सरपंच निवडला जात असे परंतु यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार असल्याने संपूर्ण गावावर प्रभुत्व असणे व मतदारांवर छाप पाडेल अश्या उमेदवार शोध सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत.प्रत्येक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अवघ्या एका आठवडाभराचा अवधी शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार शोधण्यासाठी सक्रिय झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.