दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर–
खरीप पिकांच्या सुरूवातीला संपूर्ण महिनाभर झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आँगष्टमध्ये झालेला पावसाचा खंड यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. खरीप सिझन हेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मोठे साधन असते. पण खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व हतबलता वाढत होती. अशा परिस्थितीत शेतकरी नेते तथा पीकविमा प्रश्नाचे अभ्यासक कैलास येसगे कावळगावकर यांनी पुढाकार घेत प्रथम महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांची भेट घेऊन देगलूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीसोबत केलेल्या विमा करारातील तरतूदीप्रमाणे 25% अडव्हान्स पीकविमा तात्काळ वितरीत करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली. तदनंतर मा. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन या मागणीचा पाठपुरावा केला. पत्रकार, सोशल मिडीया व इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने 25% अग्रीम रक्कम मंजूर करण्याची मागणी लावून धरली. अन् जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अखेर बुधवारी 25% अग्रीम रक्कम वितरीत करण्याची अधिसूचना काढली.
या अधिसूचनेमुळे नुकसानीच्या 25 टक्के पीकविमा देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार असले तरी ते पुरेसे नाही. आता नुकसानीच्या प्रमाणात पीक काढणी पश्चात जास्तीचा पीकविमा व वाढीव शासकीय मदत मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी माहिती कैलास येसगे यांनी दिली.