दैनिक चालू वार्ता शिराढोण सर्कल प्रतिनिधी – लक्ष्मण कांबळे
शिराढोण
उस्माननगर ता.कंधार येथे २०१७ मध्ये स्थानिक लोक लोकसहभागातून व ‘ नाम फाउंडेशन , साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने नाला खोलीकरण,रुंदीकरण ,माथा ते पायथा जलसंधारण काम केले. परिणामी या कालावधीत नेमका काय परिणाम झाला याची गुरुवारी दि. २९ सप्टेबर रोजी नाम फाउंडेशनच्या पथकाकडून ड्रोन कॅमेराव्दारे पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.त्यावेळी अनेकांनी गाळ उपसण्याची मागणी समोर धरली.
गावाच्या जवळच पश्चिमेला असलेल्या नाल्याचे काम इ.स. २०१७ मध्ये अनेकांच्या मदतीने व लोकसहभागातून सात किलोमीटर खोलीकरण करण्यात आले . नाला व परिसरातील शेती, पिकांची पाहणी करण्यासाठी” नाम फाउंडेशन” पथकातील बालाजी कोंपलवार, बसवदे सर, यांच्या सह कॅमेरामन पथकातील हर्षवर्धन कुट्टे पाटील, ज्ञानेश्वर तुपे पाटील, अशोक जाधव, प्रशांत सपकाळ, या औरंगाबाद हून आलेल्या पथकानी पहाणी केली.
ड्रोन कॅमेरा द्वारे सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करताना जलसंधारण कामानंतर बदलली पाणी पातळी, त्यामुळे होत असलेला बदल याविषयी गावच्या सरपंच गयाबाई घोरबांड, प्रयोगशील शेतकरी अशोक काळम यांच्या प्रतिक्रिया चित्रीकरण करण्यात आल्या.
यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य संजय वारकड, गोविंद पोटजळे, दत्ता पाटील घोरबांड, पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, देवीदास डांगे, आदींची उपस्थिती होती.
दहा वर्षा पूर्वीचा इतिहास बघितला तर नांदेड जिल्ह्यातील जीवघेण्या भीषण पाणी टंचाईचे गाव म्हणून उस्माननगर कडे पाहीले जात होते.पूर्वी ओळखले जाणारे उस्माननगर गाव २०१७ साली नाम फाउंडेशन ने पुढाकार घेऊन गाव व परिसरातील शेताशेतातून जलसंधारण कामे पूर्ण केली. परिणामी पावसाळ्यात पाणी अडवून थेंब न थेंब वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी नाम फाउंडेशन सोबत परिश्रम करून पाणी आडवा,पाणी जिरवा,हे जमीनीत साठवणूक केली.
यामुळे भीषण पाणी समस्या दूर करण्यासाठी दिशा मिळाली. जमीनीत पाणी मुरल्या मुळे सहाशे ते सातशे फूट खोल गेलेली पाणी पातळी वाढण्यास मदत झाली.
आज पाच वर्षापासून गाव टँकरमुक्त आहे. गाव व गावालगत विहीर, बोअरवेल ची पाणी पातळी वाढली आहे. पूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या तिव्र होती, शेती कोरडवाहू होती. पशुधन घटले होते. गावकऱ्यांनी सामुदायिक प्रयत्नातून करण्यात आलेल्या माथा ते पायथा जलसंधारण कामांमुळे जमीनीत पाणी पातळी वाढली आहे.
यामुळे उस्माननगर गाव पाणीदार होण्याच्या मार्गावर आहे. आज पाणी पातळी वाढल्याने अनेक शेतातील बंद पडलेल्या बोअरवेल सुरू झाले आहेत. पावसाळ्यात सुद्धा कोरड्या असणाऱ्या विहिरी आता तुडुंब भरत आहेत. यामुळे शेतकरी ऊस, केळी, फळबाग, भाजीपाला,हळद,यासारख्या नगदी पिकांकडे वळले आहेत. आधुनिक काळातील बदलते तंत्रज्ञान स्विकारुन परवडणारे पिके घेतली जात आहेत. शासनाच्या सिंचन विहिरीला पाणी पातळी वाढली असल्यामुळें फळभाज्या व नविन पिके घेण्याचा कल वाढला आहे.
पाणी उपलब्ध असलेल्या शेतात उन्हाळ्यात भुईमुग, उडीद,सोयाबीन, सारखी पिके घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
हिरवा चारा उपलब्ध असल्यामुळे दुधाळ जनावरांचे प्रमाण वाढले आहे. पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत असताना नाला खोलीकरण, रुंदीकरण, बंधारे यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. पुन्हा एकदा लोक सहभाग उभा करून नाम फाउंडेशन ची मदत घेऊन पाण्याची जपवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जीवघेण्या भीषण पाणी टंचाई समस्येकडून पाणीदार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा आवश्यक लोकसहभागातून बंधारे,तलाव यातील गाळ काढण्यासाठी पुढे यावे अशी मागणी शेतकऱ्यां बरोबर नागरिकांनी केली आहे. यावेळी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, प्रगतिशील शेतकरी अशोक काळम यांच्यासह अनेकांनी जलयुक्त शिवार अभियान व नाम फाउंडेशनच्या वतीने केलेल्या कामाचे अभिनंदन करून गाळ उपसण्याची मागणी केली.
————————-