दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. केंद्र सरकार देशातील वाढत्या महागाईसाठी जागतिक परिस्थितीला जबाबदार धरू शकत नाही.
असेच चालू राहिले तर भारताचा विकासदर आणखी खाली जाईल, असंही चिदंबरम यांनी म्हटलं.
चिदंबरम म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेवर केंद्र सरकार खूश आहे. पण मला वाटतं हे हवेत गोळीबार केल्यासारखं आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील कराचे उदाहरण देत ते म्हणाले, “सरकार म्हणतं आम्ही काहीही करू शकत नाही, जागतिक स्थितीमुळे मंदीची स्थिती आहे. तसे असेल तर तुम्ही सरकारमध्ये काय करता? असा सवालही चिदंबरम यांनी केला. तसेच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावलेले अव्वाच्या सव्वा कर कमी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
चिदंबरम म्हणाले की, इतर देशांशी तुलना करण्यात काहीही अर्थ नाही. सरकारने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण आयातीवर अधिकाधिक अवलंबून होत चाललो आहोत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काहीही करत नाही, असंही ते म्हणाले. विकासदराबाबत त्यांनी जागतिक बँकेच्या नुकत्याच जाहीर केलेल्या मूल्यांकनाचा हवाला दिला.
दरम्यान सरकारकडून देण्यात येत असलेलं मोफत रेशन ही एक नैतिक जबाबदारी आहे. जोपर्यंत गरीब लोक मोठ्या संख्येने आहेत. तसेच कुपोषणाचे प्रमाण आहे, तोपर्यंत मोफत रेशन गरजेचे आहे. लोकांना अन्न विकत घेण्यासाठी उत्पन्न मिळेपर्यंत त्यांना अन्न पुरवावेच लागेल असंही चिदंबरम यांनी नमूद केलं.
देशातील महागाई आटोक्यात आणण्यासाठी झोपलेल्या सरकारला आधी जागे होण्याची गरज आहे. त्यानंतर परिस्थिती काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, विकास दर आणखी मंद होईल, असा इशाराही चिदंबरम यांनी दिला.