दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिलाय.
निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश दिला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यास सुरुवात केलीय.
रविवारी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांशी उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं आहेत. बाळासाहेबांसारखे खणखणीत नाणे आपल्याकडे आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“आपल्याकडून फुटण्याआधी खासदार मला म्हणत होते की पुढल्या निवडणुकीत मोदी यांच्या नावाचा आपल्याला वापर करावा लागेल. मग माझा त्यांना सवाल आहे की आमच्यातून फुटल्यानंतर तुमच्या गटाला बाळासाहेबांच्या नावाची गरज लागते?” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले आहेत. आता ही शेवटची लढाई आहे. ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं. हा निखाऱ्यांवरचा प्रवास आहे. या प्रवासात तुम्ही माझ्याबरोबर आहात,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.