दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील एका क्रूझमध्ये बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ सेवन केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आले होते.
त्या प्रकरणात आणखी २० जणांचा समावेश होता. अटक केलेल्यांपैकी काहींकडे अमली पदार्थही सापडले होते.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यावेळी काम करणारे अधिकारी आजही कार्यरत आहेत, त्यांच्या कामात अनेक उणिवा होत्या, त्या या तपासणीत समोर आल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला पाठवला आहे.
एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात पुरावे नसतानाही तपास सुरू असून प्रकरण पुढे नेले जात आहे. या प्रकरणात 4 वेळा 65 जणांचे विधान नोंदवण्यात आले असून, हे लोक वारंवार विधान बदलत होते. त्यामुळे अनेकांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान विशेष चौकशी पथकाला काही वेगळे पुरावे हाती लागल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणांमध्ये पैशांचा व्यवहार झाला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, मात्र तक्रारदाराने जबाब बदलल्याने या दृष्टीकोनातून तपास अद्याप पूर्ण झालेला नाही.
एनसीबी अधिकाऱ्यांवर संशय
आर्यन खानला जाणूनबुजून टार्गेट करण्यात आल्याचेही या प्रकरणाच्या तपासात उघड झाले, मात्र असे का करण्यात आले हे अद्यापही समोर आले नाही. एनसीबीच्या तपास पथकाला या प्रकरणात 7 ते 8 एनसीबी अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटली आहे. ज्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, एनसीबी मुख्यालयाने समीर वानखेडेला तपासातून काढून टाकले. वानखेडे आणि त्यांच्या टीमवर गंभीर चुका केल्याचा आरोप होता.