दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशान्वये सर्वसाधारण बदली प्रक्रियेअंतर्गत ४६४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कण्यात आल्या आहेत.प्रलंबित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने पोलीसांना ही दिवाळी भेट मानली जात आहे.राज्यात दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या खोळंबल्या होत्या.एकाच ठिकाणी काम करून कर्मचाऱ्यांमध्ये निरुत्साह वाढला होता.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या तोंडावर ४६४ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.त्यापैकी अपवाद वगळता बहुतेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे व ते ज्या ठिकाणी काम करण्यास इच्छूक आहेत,त्या ठिकाणी झालेल्या आहेत.राज्य सरकारच्या निर्णयानुसार ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एकाच जागी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे त्यांची विभागीय बदली अनिवार्य आहे,त्यानुसार एस.पी.अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील ४६४ कर्मचाऱ्यांच्या पोलीस ठाणे,वाहतूक विभाग,विशेष शाखा,पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष या ठिकाणी बदल्या केलेल्या आहेत.बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये २५ सहायक पोलीस उपनिरीक्षक,६६ जमादार,९४ पोलीस नाईक,१७४ पोलीस कर्मचारी,७८ महिला कर्मचारी,२० चालक अशा एकूण ४६४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.