दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️शासनाप्रती घरकुल लाभार्थ्यांचा तीव्र संताप
▪️पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे चौथ्या टप्याचे अनुदान रखडल्यामुळे घरकुलाची कामे अर्धवट स्थितीत
——————————————-
अमरावती :-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी ही करण्यात आली;परंतु केंद्राचे अनुदान रखडल्याने अंजनगाव सुर्जी शहरात घरकुल लाभार्थ्यांची ही दिवाळी सुद्धा उघड्यावर जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.गत पाच वर्षांपासून अंजनगाव नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या १०९० घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे केंद्र शासनाचा चौथा टप्पा म्हणजेच ९० हजार रुपये अजून येणे बाकी आहे.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरकुल कामे अर्धवट स्थितीत आहेत.त्यामुळे घरकुल संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत चार-पाच वर्षांपूर्वी अंजनगाव नगरपरिषद १०९० घरकुल लाभार्थ्यांना निवड करून लाभ देण्यात आला.या योजनेमध्ये अडीच लाख रुपये मिळणार होते.यात केंद्र व राज्य सरकारचा वाटा असतो.अंजनगाव नगरपरिषदेने आतापर्यंत राज्य सरकारचा एक लाख रुपये व केंद्र सरकारचे ६० हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांना वितरित केले;परंतु केंद्र सरकारचा उर्वरित टप्पा ९० हजार रुपये अजुनही १०९० घरकुल धारकांच्या वाट्याला आला नाही.त्यामुळे ही दिवाळी पण उघड्यावर जाणार की काय?असा प्रश्न सर्व घरकुल लाभार्थ्यांना पडला असून सर्वच लाभार्थी सध्या चिंतेत आहेत.यासंदर्भात नगरपरिषदेला विचारणा केली असता वेळोवेळी निधी नसल्याचे त्यांनी कबूल केले आहे.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे घराचे काम अर्धवट राहिल्याने घरकुल लाभार्थी चौथ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत.अंजनगाव शहरामध्ये घरकुल संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केले होते.दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर अंजनगाव सुर्जी येथील नागरिकांनी नगरपरिषद अंजनगाव सुर्जी येथे आंदोलनाला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपला रोष दर्शविला.घरकुल संघर्ष समितीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले.ज्यावर शहरातील जवळपास ६०० घरकुल धारकांनी उपस्थिती दाखवून निवेदनावर स्वाक्षर्या केल्या तर धरणे आंदोलनस्थळी हजारांच्या वर नागरिकांनी भेटी देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
घरकुलासंबंधी प्रश्न मार्गी लावण्याकरिता समितीचे कार्यकर्ते निलेश ढगे,राजेश अस्वार,राजेंद्र पाटील,विक्की लांजे,वृषभ सातपुते,अविनाश रेखाते,परमेश्वर श्रीवास्तव,मंगेश पाटील,योगेश थोरात,डॉ.श्याम नेमाडे,विलास गवई,देवानंद महल्ले,गजानन कतोरे,राजेंद्र ढोरे,नीलेश पोटे,चंद्रकांत ढोरे,मनोहर पाटील आदी असंख्य कार्यकर्त्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते.