दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मोताळा, दि. २० (प्रतिनिधी) :-
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी, सोयाबन – कापसाचे भाव वाढावे तसेच इतर मागण्यांसाठी ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा, संघटनेच नाही किंवा कुणाच्या स्वार्थासाठी हा मोर्चा नसून एल्गार मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा आहे. आपल्या हक्काच्या या लढ्यात सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी २० सप्टेंबर रोजी मोताळा तालुक्यात विविध गावांमध्ये शेतकरी, शेतमजुरांच्या भेटी घेऊन संवाद साधला तर बऱ्याच गावांमध्ये सभा पार पडल्या.
मोताळा तालुक्यातील चिंचपूर, भोरटेक, शेलापूर बुद्रूक, मोकाडी, जाहागीरपूर, शेलगाव बाजार, सावरगाव, निपाणा, माळेगाव, आव्हा, उऱ्हा, दहिगाव, लिहा, तळणी, शेलापूर खुर्द आदी गावांमध्ये सभा पार पडल्या. या सर्वच ठिकाणी शेतकरी, शेतमजुरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी, दुधावाले शेतकरी एकत्र येऊन, आंदोलन करून भाव मिळवून घेतात परंतु सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी संख्येने मोठे असुनही एकत्र येत नाही, ही शोकांतिका आहे. मात्र आता पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन शेतकऱ्यांनी एकत्र येत एल्गार मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा निर्धार केला असून त्याचा प्रत्यय गावोगावी येत आहे. पावसाने सोयाबीन,कापूस यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. अद्याप पंचनामे नाही, दुसरीकडे शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व सोयाबीन – कापसाला भाव मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही यावेळी रविकांत तुपकरांनी दिली.
यावेळी अमोल राऊत, प्रदीप शेळके, मारोती मेढे, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, दत्ता पाटील, उमेश राजपूत, भागवत धोरण, कैलास गावंडे, पवन भारसाखळे, दादाराव पाटील, सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, वासुदेव मेढे, निखिल शिंबरे, मुकुंदा शिंबरे, किशोर शेळके, शुभम मेढे, निनाजी घाटे, श्रीकृष्ण घाटे, गणेश वाघ, अतुल नारखेडे यांची उपस्थिती होती.
या तालुक्यांत झाला तुपकरांचा दौरा
१४ ऑक्टोबर रोजी निपाणा, मोताळा येथे १५ ला बुलढाणा व चिखली येथे, १६ ला मेहकर तालुक्यात, १७ सिंदखेड राजा, १८ ऑक्टोबर रोजी लोणार तालुक्यात, १९ रोजी शेगाव तालुक्यात तर २० ऑक्टोबर रोजी मोताळा आणि २१ ऑक्टोबर रोजी खामगाव तालुक्यात रविकांत तुपकर यांनी दौरा करुन एल्गार मोर्चाची आग शेतकऱ्यांच्या मनात पेटवली आहे.