दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : गौतमी पाटील कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर काय असेल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. गौतमीचा कार्यक्रम कुठेही असला तरी त्याठिकाणी हजारोंच्या संख्येनं तिचे चाहते गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे.
दोन दिवसांपूर्वी तिचा सांगली जिल्ह्यातील एका गावात झालेल्या कार्यक्रमानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. आता गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
गौतमीचा लावणीचा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी घटनास्थळी एक मृतदेह आढल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यावरुन गौतमीनं काल पुण्यात प्रेस कॉन्फरस घेतली. यावेळी तिनं दिलेल्या उत्तरांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गौतमीनं आपण कोण आहोत, कुठून आलोत, आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत याविषयी सांगितले होते. त्यामुळे तिच्यावर सुरु झालेल्या चर्चेनं वेगळे वळण घेतल्याचे दिसून आले होते. गौतमीनं फार कमी वयातच कौटूंबिक परिस्थितीमुळे आपल्यावर जबाबदारी येऊन पडली. अशातच आपण लावणी शिकलो आणि परफॉर्मन्स करु लागलो.
गौतमीनं आपल्यावर होणाऱ्या टीकेवर परखडपणे उत्तर दिलं आहे. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. त्यात तथ्य नाही. तो मृतदेह कुणाचा, तिथे तो कसा आला हे मला काही माहिती नाही. येत्या काळात माझ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळापत्रक व्यस्त असून त्यातून जराही सुटका नसल्याचे गौतमीनं सांगितले होते. मात्र यासगळ्यात सांगलीची सुपारी गौतमीला महागात पडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे की काय गौतमीवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गौतमीनं त्या प्रेसमध्ये सांगितले होते की, मी कोल्हापूरची नाही. तर धुळ्याची आहे. शिंदखेडा येथील गावात माझा जन्म झाला. तिथेच मोठी झाली. मी तिथून आठवीत असताना पुण्यात आले. शिक्षण कमी झालंय. त्यानंतर मी नृत्य क्षेत्रात आली. आणि माझा प्रवास सुरु झाल्याचे गौतमीनं म्हटले होते.