दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी नगर परिषद प्रशासनाने डास प्रतिबंधक फवारण्यांना तिलांजली दिली आहे.शहरातील उकिरडे,नाल्या,रिकामे प्लॉटमध्ये साचलेले डबके यावर नियमित डास प्रतिबंधक फवारण्या होत नसल्यामुळे शहरांमध्ये विविध आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.नगर परिषद प्रशासनाने वेळोवेळी डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे.अंजनगाव सुर्जी नगर परिषदेमध्ये सध्या अनागोंदी कारभार असल्याचे शहरवासीयांच्या चर्चेमध्ये बोलले जात आहे.शहराचा आरोग्य विभाग सुस्त झाला आहे.यावर्षी पावसाळ्याचा मुक्काम वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.सदर डास हे डेंग्यू,मलेरियासारखे गंभीर आजार पसरवनारे व तेवढेच जीवघेणे आहे.घरातील कुठल्याही भागात,रस्त्यावर,कार्यालयात,कॉन्व्हेंट,अंगणवाड्या,शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस,खाजगी वा सरकारी दवाखाने किंवा कुठल्याही प्रतिष्ठानमध्ये डास निवांत बसू देत नाही.प्रत्येक ठिकाणी डासांनी हैदोस घातला आहे.
डास चावल्यामुळे डेंगू,मलेरिया,होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हत्तीपाय होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होत असल्याने नागरिकांचे जगणे कठीन होत असतांनाच त्याकडे मात्र नगर परिषद प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.डासांच्या चावण्यामुळे शहरात विवीध आजार बळावल्याने अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांचे आरोग्य,पैसा व वेळेचा अपव्यय होऊ लागला आहे.खाजगी आणि सरकारी दवाखान्यात रुग्णाची गर्दी वाढल्याचे चित्र दिसुन येत आहे.आतातरी नगर परिषद प्रशासनाने दर्जेदार डास प्रबंधक औषधांची शहरातील प्रत्येक परिसरात नियमीत फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतिने,सामाजिक कार्यकर्ता पंकज हिरुळकर यांनी प्रसार माध्यमांद्वारे केली आहे.
________________________
– तर शहरवासीयांची डासांच्या जीवघेण्या डंखातून सुटका झाली असती;
यावर्षी तब्बल पाच महिने पाऊस पडला. त्यामुळे शहरामधील रिकामे प्लॉट,खड्डे,नाल्या,शेणांची उकिरडे या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे.त्यामुळे नगरपरिषदेने डास प्रतिबंधक औषधांची नियमित फवारण्या केल्या असत्या तर,शहरवासीयांची डासांच्या जीवघेण्या डंखापासून बऱ्याच प्रमाणात सुटका झाली असती.