दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
दिल्ली/परभणी : पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ मानला जातो. देश मजबूती साठी पत्रकारांचे नियमितपणे मोठे योगदान असते. अन्यायग्रस्तांचा दबलेला आवाज व्यक्त करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार आपल्या लेखणीतून चव्हाट्यावर आणून वास्तव मांडत असतो. किंबहुना त्यासाठीच पत्रकाराला बातमी लिहिण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, असे ठाम मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त करीत देशभरातील प्रशासकीय यंत्रणेला आगळा वेगळा संदेश देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.
पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या एका न्यायालयीन निर्णयाविरोधात आपले मत व्यक्त करताना जे मत व्यक्त केले आहे, ते अत्यंत उल्लेखनीय असेच म्हणावे लागेल.
पत्रकाराने सरकारच्या विरोधात भविष्यात काहीच लिहू नये, या अटीवर जामीन देण्यात येईल असे सूचित केले होते. त्यावरच न्यायाधीश चंद्रचूड यांनी पत्रकाराला काहीही न बोलण्याचे किंवा कांहींच न लिहिण्याचे सूतोवाच करु नये अशा प्रकारचा सल्ला दिला आहे. ते पुढे आपल्या वक्तव्यात असेही म्हणाले की, वकिलानी जर कोणत्याही प्रकारचा युक्तीवाद करु नये, त्यांना रोखले तर चालेल का ? तसेच पत्रकारांनाही तुम्ही ही बातमी बनवू नये किंवा लिहू नये असे म्हणता येणार नाही किंवा त्यांना रोखताही येणार नाही. नॅशनल युनीयन ऑफ जर्नालिस्ट ऑफ इंडियाच्या अयोध्या समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एवढेच नाही तर देशभरातील सर्वच पत्रकार संघटनांनी सर्वोच्च न्यायालयातील या
न्यायाधीशांनाही धन्यवाद दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे लोकशाही मजबूत करणे असाच आहे.