दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय कराळे
**************************
परभणी/पूर्णा : कथित पॅनकार्ड अपडेटच्या सबबीखाली सुमारे दोन लाख रुपयांची झालेली फसवणूक धक्कादायक ठरली आहे. डिजीटल भारत व्यवस्था जेवढी फायदेशीर दिसत आहे त्यापेक्षा अधिक ती धोकादायक सुध्दा ठरली जात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
हॅलो….मी अमुक अमुक बॅंकेतून बोलत आहे. आपलं पॅनकार्ड अपडेट करायचं आहे. केवायसी अपडेट झाले नाही, त्यासाठीचे आवश्यक कागद-पत्रे अद्याप जमा केली नाहीत. आपले पूर्ण नाव काय ? पूर्ण पत्ता हवा आहे. अशा प्रकारचा संवाद साधून ग्राहकांना अचानक बुचकळ्यात टाकणारे महाठग बॅंकेच्या नावावर खुलेआम फसवणूक करीत आहेत. अगोदरच आपापल्या कामात व्यस्त असलेले ग्राहक बॅंकेचे नाव सांगितल्यामुळे विश्वास ठेऊन अधिक चौकशीच्या फंदात न पडता क्षणाचाही विलंब न लावता सर्व काही सांगून टाकत असतो. अर्थात ती सुध्दा आपली मोठी घोडचूकच म्हणावी लागेल परंतु तसे न करता अधिक सतर्कता घेतली गेली तर पूर्णा येथील महिला अधिकारी ग्राहकाची जी फसवणूक झाली आहे, तशी झालीच नसती याचेही विस्मरण होता कामा नये.
पूर्णा येथील शाहीद हुसेन साबीर हुसेन नामक महिला एका कंपनीत सरव्यवस्थापक या पदावर कार्यरत असून त्यांचे पूर्णा येथील एसबीआय बॅंकेत खाते आहे. त्यांना एसबीआय बॅंकेतून पॅनकार्ड अपडेट्सच्या सबबीखाली दि. ०९/११/२२ रोजी मोबाईलवर आलेल्या संदेशात समोरच्याला हवी ती माहिती विचारली गेली म्हणून शाहीद हुसेन यांनी ती सांगितली. त्यानंतर लगेच एकदा रुपये ९१ हजार व त्यानंतर पुन्हा एकदा रुपये ९० हजार असे एकूण एक लाख एक्याऐंशी हजारांची रोकड त्यांच्या खात्यातून वळती झाल्याचा मेसेज शाहीद हुसेन यांना मोबाईवर आला. त्यानंतर पुन्हा आपले केवायसी अपडेट नाही व ओटीपी नंबर सांगणे असा म्हणून मेसेज आला. तथापि आपली फसगत झाल्याचे शाहीद हुसेन यांच्या पूरते ध्यानी येताच संबंधित व्यक्तीला विचारण्यासाठी शाहीद यांनी मोबाईल वरुन संपर्क साधला असता समोरच्याने आपला फोन बंद करुन टाकल्याचे आढळले. परिणामी पूर्णा येथील पोलिसांत धाव घेऊन शाहीद हुसेन यांनी घडलेला प्रकार कथन करुन कथित फसगत करणाऱ्या विरोधात तक्रार गुदरली आहे.
एका बाजूला डिजिटल भारत व्यवस्थेचं स्वप्न पूर्णत्वास नेले जात असतांना जी सुविधा पूर्ण उपलब्धता प्राप्त झाल्याचं समाधान लाभल्याचा आनंद मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला याच डिजिटल युगात क्षणार्धात होणारी लाखो रुपयांची फसवणूक धक्कादायक अशीच ठरली जात आहे. अशा प्रकारांना डिजीटल पध्दतीनेच आळा घातला जाणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा फसगत करण्याच्या अशा प्रकारात दिवसेंदिवस अधिकच वाढत होऊन ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटच होऊ शकेल यात तिळमात्र शंका नसावी. ज्यामुळे “भीक नको पण कुत्रा आवर” या प्रणालीच्या ते सुविधा नको पण फसगतीतून होणारी लूट वाचली पाहिजे असे म्हणण्याची पाळी येऊ नये एवढे नक्की.
दरम्यान शाहीद हुसेन या एका कंपनीत सरव्यवस्थापक पदावर कार्यरत असूनही त्यांची झालेली आर्थिक फसगत लक्षात येऊ शकत नसेल तर सर्वसामान्य ग्राहकांची काय कथा असू शकेल, हा खरा चिंतेचा सवाल आहे. डिजीटल भारत व्यवस्था जेवढी आधुनिक सुधारक तेवढीच भयान घातक ठरली गेल्यास चुकीचे ठरु नये असंच म्हणावे लागेल.