दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
द्वारका नगरी वसाहतींमधील नागरिकांनी नुकतेच एक निवेदन देऊन नवा मोंढा पोलिसांना मदतीचे व गस्तीचे सहकार्य मागितले आहे.
परभणी : कारेगाव रोडवरील द्वारका नगरी वसाहत, क्रांती नगर, प्रगती नगर, बळीराजा सोसायटी परिसर मागील काही दिवसांपासून चोरांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. द्वारका नगरी वसाहत मधील पाच घरांवर एकाच रात्रीत घरफोडीचा भयान प्रकार करुन सूर्या चोरांनी या परिसरातील नागरिकांची निंद हराम करुन टाकली आहे. दिवसा भंगार विक्री किंवा अन्य कोणत्याही धंद्यांच्या नावाखाली रेकी करणारे हेच रात्रीच्या चोरी प्रकरणात लिप्त असू शकतील असा संशय बळावला जाणे स्वाभाविक आहे. दिवसा आपापल्या नोकरी, धंद्यांच्या निमित्ताने घराबाहेर पडणारे या परिसरातील नागरिक रात्री साखर झोपेत असतात. त्याच संधीचा गैरफायदा घेऊन भूरटे चोर घरांवर डल्ला मारण्याचे कारस्थान करीत असतात. परिणामी पोटाला चिमटे घेऊन तथा थोड्या बहुत दागदागिने यांसह पै-पैसा जमविलेली पूंजी लंपास करण्याच्या या प्रकारामुळे नागरिक मात्र पूरते भयभीत झाले आहेत. परभणी शहराची वाढती लोकसंख्या ध्यानी घेता त्या तुलनेत आवश्यक पोलीस दलात अपूरे पोलीस बळ असल्यामुळे नागरिकांची सुरक्षा पूर्ती वाऱ्यावर सोडली गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना मात्र भयभीत वातावरणात परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या आणि लग्नसराईचा कालावधी असल्याने बरेचसे नागरिक आपल्या परिवारासह निरनिराळ्या गावांना गेले आहेत. नातेसंबंधांची नाळ जोडणे व पारिवारिक हित जपण्यासाठी प्रत्येकाला यासाठी नाईलाजाने का होईना परंतु घर सोडून जावेच लागते. नेमका याच संधीचा फायदा घेऊन डल्ला मारु पहाणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी द्वारका नगरी वसाहत मधील नागरिकांनी आता पूर्ती कंबर कसली आहे. परिसरात योग्य प्रमाणात उजेड राहिला जावा यासाठी पुरेशी वीज व्यवस्था केली असून रात्रीच्या गस्ती साठी सुरक्षा रक्षकाचीही व्यवस्था तैनात केली आहे. केवळ पोलिसांवरच विसंबून न राहाता आपली सुरक्षा आपल्या हाती, या प्रणालीप्रमाणे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरी ते हितावह समजून करणे भागच पडणार आहे. असं असलं तरी पोलिसांनी सुध्दा आपली जबाबदारी न झटकता जनतेचे सेवक असल्याचे गृहीत धरुन किमान एक तरी गस्तीची फेरी या वसाहतीमध्ये मारणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना तर धीर मिळू शकेलच शिवाय चोरावर सुध्दा भीतीचा अंकुश राहिला जाईल एवढे नक्की. नागरिक व पोलीस यांच्या समन्वयातून रात्रीच्या वेळी गस्ती पथके तैनात केली गेल्यास मोठा फरक पडू शकेल. गस्ती पथकातील समाविष्ट नागरिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून त्या संबंधीचे ओळखपत्र व एक काठी व गणवेश पुरवला गेल्यास त्याचाही बऱ्यापैकी फायदा होऊ शकेल. परभणी पोलीस अधीक्षकांनी शहरात सर्वत्र अशा प्रकारची गस्ती पथके तैनात केल्यास पोलिसांना सहकार्य तर मिळू शकलेली शिवाय चोऱ्या, घरफोड्या व दुकान लूटीच्या प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल यात तिळमात्र शंका नसावी. अशा गस्ती फेऱ्यांमुळे अन्य गुन्ह्यांची तथा गुन्हेगारांची सुध्दा ऊकल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.