दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील पंचवीसहून अधिक गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. धर्माबाद तालुक्यातील २५ गावांपैकी बन्नळी गावातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच निवेदन दिलं आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अद्याप कोणत्याही सुविधा न मिळाल्याने तेलंगणात जाण्याची इच्छा असल्याचं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं.५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील ४० गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यानच्या काळात तत्कालीन सरकारने, प्रश्न मार्गी लावण्याचं आणि ४० कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजतागायत एकही रूपयाचा निधी आला नसल्याचा दावा या गावकऱ्यांनी केला आहे. ना निधी आला ना विकासकामं झाली, महाराष्ट्र सरकारने आम्हाला फासावर लटकवून ठेवलं, असाही आरोप केला.
दुसरीकडे, तेलंगणा राज्यात उपलब्ध असलेल्या मुलभूत सुविधा आणि प्रत्येक सरकारी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. शेतकऱ्याला 18 तास वीज मिळते, मुलगी झाल्यास 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर 5 लाख रुपये मिळतात. अनेक सरकारी योजनांचे लाभ मिळतात. मात्र तेलंगणाच्या सीमेला लागून असलेली महाराष्ट्रातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत. आजतागायत निधी मिळालेला नाही, केवळ आश्वासनांवर आश्वासन मिळतं आहेत. त्यामुळेच तालुक्यातील 25 गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केव्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.