दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
वेळीच उपचार घेणे आवश्यक
जव्हार:- तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात झालेला बदल आणि पहाटेची थंडी,दिवसा उन्हाची तीव्रता कमी अधिक प्रमाणात तर मध्येच अवकाळी पाऊस झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या असून बदलत्या वातावरणामुळे मागील काही दिवसांत सर्दी,ताप,खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याचे पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय व शहरातील खासगी रुग्णालयातील बाह्य विभागात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे.बऱ्याचदा सहव्याधीग्रस्त खोकल्याच्या रुग्णांना उपचारार्थ काही काळ दाखल करावे लागू शकते.त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार करावा,असा सल्ला पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मराड यांनी दिला आहे.
अनेकजण साधारण ताप आहे म्हणून अंगावर काढत आहेत.मेडिकल मध्ये जाऊन मोघम औषधे घेत आहेत,दोन दिवस वाट पाहून आराम न पडल्यास रुग्णालयाची वाट धरीत आहेत असे न करता वेळेस डॉक्टरांकडे तपासणी करून उपचार घ्यावे असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.
पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण वाढले
मागील काही दिवसांत पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयासह जव्हार शहरातील खासगी रुग्णालयातील ओपीडीमध्ये सर्दी,खोकला व तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
ताप खोकल्यांच्या औषधांची मागणी दुप्पट
खोकल्याचे औषध,अँटीबायोटिक,पॅरासिटामील,सिट्रीजन आदी. औषधांची मागणी वाढली असल्याचे दिसून येते.पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयात अनेकजण खोकल्याच्या औषधांची मागणी करीत आहेत.
शासकीय रुग्णालयात मोफत मिळते सिरप
खोकल्यावर अनेकजण घरगुती उपचार करत असले तरी पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयात मोफत खोकल्याचे औषध मिळते.डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घेता येऊ शकते.
डिंकाचे लाडू खा अन् पाणी उकळून प्या
पूर्वीच्या काळापासून डींकाचा वापर पोटातील जंत,खोकला व घशातील खवखव दूर करण्यासाठी केला जातो.तसेच पाणी उकळून पिणे लाभदायक ठरते.
मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे खोकला,सर्दी,तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.साधारण ताप आहे असे समजून कुणीही ताप अंगावर काढू नये.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही औषधोपचार घेऊ नये.
डॉ.रामदास मराड,वैद्यकीय अधीक्षक,पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय,जव्हार