दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची आणि अनेक नाट्यमय घडामोडी होऊ लागल्या आहे. आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आ. सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी कुणालाही न जुमानता पदवीधरचा अर्ज दाखल केला.
त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. अर्ज माघारीच्या वेळेनंतर त्यांनी कोपरगाव येथे जाऊन कोल्हे यांच्या शिक्षण संस्थेत भेटीगाठी सुरू करून एकप्रकारे प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येते.
ऐनवेळी घडलेल्या राजकीय नाट्यामुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पुरस्कृत केले आणि सत्यजित तांबे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत असूनही त्यांना भाजपचा पाठिंबा घ्यावा लागला. यामुळे तांबे अपक्ष म्हणून सहज निवडून येतील अशी सर्वांनाच खात्री होती. परंतु आता तांबे व महाआघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, सत्यजितसाठी भाजपने दबाव वापरून धनंजय जाधव व नाशिकचे विसपुते यांचे अर्ज माघारी घेतले. शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल झाल्या होत्या.
कॉंग्रेसमुळे तांबेंना कठीण काळ?
दरम्यान, जी माणसे माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील, त्यांना माझा शब्द आहे, माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल अशा आशयाची तांबे यांची पोस्ट समाजमाध्यमात जोरदार फिरू लागली होती. त्यामुळे कॉंग्रेसमुळे त्यांना कठीण काळ पाहायला लागला का? अशीही चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली असून, आता भाजप तांबे यांना या कठीण काळातून बाहेर काढणार का, असाही प्रश्न सूज्ञ नागरिकांना पडला आहे.