दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी मतदान केले. त्याचा अर्थ राज्यातील सुशिक्षित मतदार हा महाविकास आघाडीच्या पाठिशी आहे.
त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो तर पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा नक्कीच पराभव होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला ५० किंवा फार तर ६० जागा मिळतील. भाजपाकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. राज्यात जे काही सुरु आहे त्याबद्दल जनतेच्या मनात चीड आहे. हाच राग विधानसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून उतरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येईल. येणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढतील असंही त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ मराठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
तसेच सध्याचा सत्तारुढ पक्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतेय. निवडणुका घेण्याचं धाडस नाही. २०२४ च्या निवडणुका लोकसभेसोबत होतील तेव्हा ज्या घटना राज्यात घडल्या त्या न विसरता लोक मतदान करतील. त्यामुळे भाजपाने मिशन २०० ऐवजी मिशन १०० केले तरी चालण्यासारखे आहे. आम्हाला आघाडीत ज्या जागा वाट्याला येतील त्यात राष्ट्रवादी चांगला स्टाईक रेट करेल. आमची संख्या पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्रिपदावर चर्चा होईल असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.