दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरू करू, अशी घोषणा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी गांधी आश्रम, सेवाग्राम येथे केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार काल वर्धा येथे आले होते. दरम्यान त्यांनी सामूहिक वनहक्क धारक आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला हजेरी लावली.
यावेळी मंचावर सामूहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भात राज्य व देश पातळीवर कार्यरत असलेले ज्येष्ठ व अनुभवी दिलीप गोडे, प्रतिभा शिंदे, ॲड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे, मोतीराम सयाम, अमित कळस्कर तसेच आमदार अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून खासदार शरद पवार यांनी सामूहिक वन हक्क आणि उपजीविका ग्रामसभा परिषदेसाठी गांधी आश्रम, सेवाग्रामची निवड केल्याबद्दल विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, विदर्भ व खान्देश उपजीविका मंच आदी संघटनांची प्रशंसा केली. जल, जंगल जमीन यांचे संवर्धन करणारा एकमेव घटक म्हणजे आदिवासी होय. राज्यातील विविध ग्रामसभांची शक्ती वाढली पाहिजे, असे ते म्हणाले.
ग्रामसभा ४० कोटींचा तेंदू, १५ कोटींचा महू, हिरडा, बेहडा यांसारखे काम विदर्भ ग्रामसभा महासंघ, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था यांसारख्या स्वयंसेवी संघटनांप्रमाणे सामूहिक वनहक्क आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेसंदर्भातील कार्य राज्यस्तरावर उभे राहिले पाहिजे. तसेच या संघटनांचा एक संघ राज्यस्तरावर निर्माण झाला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले. या परिषदेत विदर्भ, खानदेश या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधी व त्यांच्यासोबत कार्यरत खोज, व्हीएनसीएस, जीएसएमटी, लोकसमन्वय प्रतिष्ठान, साकव, ग्राम आरोग्य, रिवॉर्ड, वननिकेतन, इश्यु, संदेश या संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.