दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : देशातील खासगी उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या अमृतकाळात देशात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढले असून या क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत.
या संधीचा फायदा उद्योगांना घेता येईल. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
भारतीय हवाईदलातर्फे कर्नाटकातील येलंका येथे आयोजित १४ व्या एरो इंडिया या कार्यक्रमाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरार्दित्य सिंदिया, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकची मुख्य सचिव वंदिता शर्मा, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी, नौदल प्रमुख अडमिरल हरी कुमार आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, “ज्या देशात मागणी, अनुभव आणि क्षमता अधिक असते, त्या देशात उद्योग वाढतो. अशी स्थिती आता भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात सहभाग वाढवावा. स्वदेशी व नावीन्यपुर्ण तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक उत्पादने तयार करत भारताने जगभरात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
तेजस सारखे स्वदेशी विमान व आयएनएस विक्रांत हे त्याचेच उदाहरण आहे. केवळ निर्मितीच नाही तर आपल्या उत्पादनांची क्षमता पाहता, मित्र देशांचा या उत्पादनांच्या प्रति विश्वास वाढत आहे. परिणामी परदेशातील उद्योग आणि भारतातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार होत आहेत.