दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील तुराबुल हक्क परिसरात झालेल्या खूनाचा निकाल अवघ्या वर्षभरात लावला गेल्याने परभणी शहरात सर्वत्र आश्चर्य व आनंदही व्यक्त केला जात आहे. या निकालामुळे न्यायप्रणालीमधील न्यायदानाला कमालीची गती मिळाल्याचे दिसून येत आहे. खूनासारख्या गंभीर प्रकरणातील सचोटी हाताळताना साक्षी, पुरावे आणि पडताळणी या सारख्या महत्वपूर्ण अशा कार्यप्रणालीसाठी करावी लागलेली कसोटी गंभीरतापूर्वक ध्यानी घेतली असावी यात शंकाच नाही. तसेच न्याय प्रणालीने न्यायदानाच्या चौकटीत राहूनच न्याय्य असा न्याय देत वर्षानुवर्षे किंवा काही वर्षांचा कालावधी लागू शकतो या म्हणण्यातही तितकासा अर्थ नाही, हे दाखवून दिले आहे.
सरकारी काम, सहा महिने थांब, न्यायालयीन कामकाज नि कित्येक वर्षांचा लागेल कालावधी सहज, किमान पक्षी दहा-वीस वर्षे तरी निकालासाठी प्रतिक्षा करावीच लागेल, असा गोड समज बहुधा न्याय निवाड्यासाठी नक्कीच चर्चिला जात असतो परंतु या निकालाने मात्र समाज मनातील सर्व अंदाज, भाकिते आणि व्यक्त केले जाणारे आराखडे पूर्णपणे बोल ठरविल्याचे दिसून येत आहे. एखाद्या निवाड्यात साक्षी, पुरावे किंवा पडताळणीचे कामही वाढले जाऊ शकते. कधीकाळी लागणाऱ्या अधिक प्रमाणातील सुट्ट्या, न्यायप्रणालीमधील न्यायदानासाठी कर्तव्यावर असलेले सन्माननीय न्यायाधीश, शासन आदेशाच्या चौकटीत राहून करावे लागणारे कामकाज, बदल्या किंवा अन्य काही अडचणींचा सामना करताना निवाड्यासाठी अधिक काळ लागला जाऊ शकतो. किंबहुना त्यासाठीच अधिक वेळ लागला जातो, असा ठसा कदाचित बसलाही जात असेल आणि म्हणूनच निवाड्यासाठी बरीच वर्षे कालावधी प्रतिक्षा करावी लागते, ही जी समज झाली असावी, ती सर्वच प्रकरणांमध्ये आणि प्रत्येक वेळी लागली जाते असेही होत नाही. तथापि या सर्व घडामोडींच्याही पुढे जाऊन या दाव्याचा लागलेला निकाल सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असाच ठरला जाणे स्वाभाविक आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री.एस्.पी.पिंगळे यांनी आरोपी श्रीनिवास नरसय्या नागुल्ला याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बुधवार आणि मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी असा गतीमान निकाल देऊन न्यायाधीश महोदयांनी समस्त परभणी जिल्हावासियांचे लक्ष वेधले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल. न्यायदान क्षेत्रात होत असलेली गती मानता यावरुन सिद्ध होत आहे. सरकार पक्षाबरोबरच पोलीस व तपासी यंत्रणा आणि कोर्ट पैरवी या सर्वांचे अथक प्रयत्न सुध्दा गतीमान निकालासाठी भरीव मदत आणि सुनियोजित असे कार्य सिद्धीस नेण्यासाठी सार्थकी ठरले जाणे स्वाभाविक आहे. यातील साक्षी, पुरावे कमीत कमी वेळात अधिक व मुद्देसुद असेच जमा करणे, सन्माननीय न्यायाधीश महोदयांनाही ते सहजगत्या पडताळणी करणे शक्य होऊ शकतील यासाठीची आखणी, मांडणी न्यायालयीन कक्षेत करणे हे ही तितकेच मोलाचे ठरले असावे.
आठ मार्च २०२२ रोजी यातील फिर्यादी, त्यांची मुलगी, आई-वडील हे सर्व घरात बसले असताना आरोपी श्रीनिवास नागुल्ला तेथे आला नि त्या घरावर दगडफेक करु लागला. हे बघून घाबरलेले फिर्यादीचे वडील बालू गंगाराम पवार यांनी त्याला तू हे असे का करीत आहेस म्हणून विचारणा केली असता आरोपी नागुल्ला याने पवार यास जीवे ठार मारण्याची धमकी देत तो तेथून निघून गेला परंतु काही वेळा नंतर तेथे पुन्हा परतलेल्या नागुल्लाच्या हातामध्ये मात्र मला मोठा लाकडी दांडुका असल्याचे आढळून आले. काही क्षणातच नागुल्ला याने बालू गंगाराम पवार यांना सोबत आणलेल्या लाकडी दांडुक्याने जबरी मारहाण करीत अगोदर बोलल्याप्रमाणे नागुल्ला याने पवार याचे खरोखरच प्राण घेतले. अगदी एखाद्या चित्रपटाला ही लाजवेल असा हा भ्रामक प्रकार नागुल्ला याने वास्तवात करुन दाखविला. ही घटना खरोखरच संतापजनक अशीच म्हणावी लागेल.
याप्रसंगी कोतवाली पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड, विशाल गायकवाड आदींनी सख़ोल व बारकाईने तपास करुन मौलिक कर्तव्य पार पाडले होते. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्ष व पुराव्यांची योग्य अशी पडताळणी करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय श्री.एस्.पी.पिंगळे यांनी आरोपी श्रीनिवास नरसय्या नागुल्ला यास आजीवन सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. ज्यामुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेची मान उंचावली गेली आहे. न्याय प्रणालीच्या बाबतीत समाज मनात असलेला शिथिलतेचा दूराग्रह या निकालामुळे दूर झाला आहे. इतकेच नाही तर सद्भावना सुध्दा वाढीस लागली जाणे स्वाभाविक आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिले त्यात सपोनि, संतोष सानप, पोउपनि सुरेश चव्हाण, पो.ना.शंभूदेव कातकडे, प्रमोद सूर्यवंशी यांचा समावेश असून त्यांचीही कार्यपद्धती अगदी भरीव ठरली गेली. ज्यामुळे पोलीस व खाकी यंत्रणेची आन-बान-शान कमालीची वाढली आहे. एकूणच काय तर अगदी वर्षभराच्या कालावधीत लागलेल्या निकालाने परभणी जिल्ह्याच्या न्याय क्षेत्रात न्याय्य अशी कामगिरी झाल्यामुळे न्यायप्रणालीत गती आल्याचे सिध्द झाले असून सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.