दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनीधी – वसंत खडसे
” राजरंग ” ✍️
वाशिम : जिल्ह्यातील राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे, प्रभावी नेते माजी खासदार अनंतराव देशमुख हे पूर्वाश्रमीचे हे कट्टर काँग्रेसी होते. कांग्रेस मधे असतांना त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनवर अनेक वेळा काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केल्याचे सर्वश्रुत आहे. तन, मन धनाने समर्थन करणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांची एक मोठी फलटण त्यांच्या पाठीशी असल्याने ते आजही समाजातील अखेरच्या घटकापर्यंत संधान साधून आहेत. अनंतराव देशमुख हे काँगेसमधे असातांना त्यांनी जिल्ह्यात अनेक लहान~मोठे नेते घडविले असून, त्यापैकी काही नेते तनाने जरी काँग्रेसमधे असले तरी मनाने मात्र, ही मंडळी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या सोबत असल्याची खमंग चर्चा जिल्हाभरात सुरू आहे, परिणामी अनंतरावांनी भाजपचे कमळ हातात धरल्यास जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथपालथ होण्याचे संकेत राजकीय तज्ञांकडून वर्तविली जात आहेत.
अनंतराव देशमुख यांचं मूळ काँग्रेस आहे काँग्रेसच्या कारकीर्दीत ते एक वेळ मंत्री दोन वेळा खासदार राहीलेले आहेत. परंतु राजकीय नैराश्यापोटी त्यांनी गत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत काँग्रेसचा हाथ सोडला आणि स्वबळावर रिसोड~मालेगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणूक लढविली होती. सदर निवडणुकीत अनंतराव देशमुख यांना अगदी शेवटच्या टोकावर अल्पमतांनी पराभवास सामोरे जावे लागले हे सर्वश्रुत असून यावरून त्यांची जिल्ह्यातील राजकारणात असलेला प्रभाव अधोरेखित होतो. त्यांचे कट्टर समर्थक त्यांचा निर्णय शिरसावंद्य मानून काँगेस बाहेर पडणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तथापि, ही मंडळी माजी खासदार यांच्या सोबत भाजपवासी झाल्यास ही अप्रत्यक्ष काँगेसमधील फूट ठरेल आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वात जास्त विपरीत परिणाम जिल्ह्यातील काँग्रेसवर होईल असा अंदाज काही राजकीय मंडळीच्या चर्चे वरून स्पष्ट होत आहे.