दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : देशात सध्या नव्या व्हायरसची साथ पसरली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण देशभरात अनेकांना खोकला, ताप अशी लक्षणं जाणवत आहे. यावर कोणतंही औषध घेतलं जरी खोकला जात नसल्याने अनेकांना चिंता सतावत आहे.
दरम्यान खोकला जात नसल्याने डॉक्टरांकडेही रांगा लागत आहेत. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने यामागील कारण स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात ताप आणि खोकल्याच्या घटना वाढण्यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस आहे.
हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे. यामुळेच संपूर्ण देशात नवा आजार बळावला आहे. 15 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना याची लागण होत असल्याचा निष्कर्ष समोर आली आहे.
या व्हायरसमध्ये सतत खोकला आणि ताप अशी लक्षणं जाणवत आहेत. इतर फ्लूंच्या तुलनेत या H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे. लागण झालेल्यांना खोकला आणि तापासह सर्दी, मळमळ, अंगदुखी, उलट्या अशी लक्षणंही जाणवत आहेत. दरम्यान, हा आजार जीवघेणा नसल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे.
आयसीएमआरने H3N2 पासून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, लोकांना नियमित हात धुण्याचा तसंच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच लक्षणं जाणवत असल्यास मास्क घालणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, खोकताना (H3N2 Virus) आणि शिंकताना तोंडावर हात ठेवणं, डोळे आणि नाकाला स्पर्श न करणं असे सल्ले देण्यात आले आहेत. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घेण्यास सांगण्यात आलं आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनाही अशा रुग्णांवर उपचार करताना फक्त लक्षणांवर औषधं द्यावीत अशी सूचना करण्यात आली आहे. उपाचारादरम्यान प्रतिजैविकांचा वापर करु नये असं आयसीएमआरने सांगितलं आहे.