दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
राष्ट्रवादी काँग्रेस चे राज्य पदाधिकारी डॉ.अशोक जिवतोडे हे १४ मार्चपर्यंत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त अनाधिकृत सुत्रांकडून कळले असून त्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकिय क्षेत्रात उथलफुथल होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भाजपचे भावी उमेदवार म्हणुनही त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजप ला राजुरा,वरोरा विधानसभा मतदारसंघात मदत होणार असून येणाऱ्या लोकसभेसह आगामी होणा-या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजप ला नक्कीच फायदा होऊ शकतो. अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
डॉ. अशोक जिवतोडे हे मागील ३५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात असून जनता महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा शैक्षणिक प्रवास व निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आहेत. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी अध्यक्ष तथा अधिष्ठाता, नामनियुक्त सदस्य, शिक्षण अभ्यासमंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य व प्राध्यापकांच्या संघटनेद्वारे होणाऱ्या कार्यात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा सक्रिय सहभाग नेहमीच असतो. पूर्व विदर्भातील गोंडवन, आदिवासी, दुर्गम भागातील शैक्षणिक क्रांतीचे जनक शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरुजींचे चिरंजीव तथा चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या विदर्भातील अग्रगण्य अशा नावाजलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर या संस्थेचे मागील २७ वर्षापासून ते सचिव म्हणून प्रशंसनीय संघटन कार्य करत आलेले आहे.
तसेच दरवर्षी संस्थेच्या तथा स्व.जीवतोडे गुरुजी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जिल्हाभरात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, संवर्धन व रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेणाऱ्या इतर सामाजिक संघटनांना वृक्ष आणि बियाणांचा मोफत पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमित केले जाते. संस्थेअंतर्गत तसेच संस्थेबाहेर विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रोत्साहन, विशेषतः संशोधन कार्य, साहित्य प्रकाशन, चित्रकला, रंगकर्मी, पत्रकारिता आदी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन आणि सर्व प्रकारची मदत केली जाते. शेतकऱ्यांसाठी समाजप्रबोधन तथा अंधश्रद्धा निर्मूलन व विद्यार्थ्यांसाठी नैराश्यातून घडून येत असलेल्या आत्महत्या संदर्भात प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यांच्या माध्यमातून व्यसनाधीनता व वाढत असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी, म्हणूनच राष्ट्रीय कीर्तीचे विविध प्रबोधनकार, कीर्तनकार यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून हजारों लोकांची उपस्थिती असते. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि अन्य मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन त्यांनी आजवर केलेले आहे.