दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवि दिल्ली : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी लंडनमधील चॅट्हॅम हाऊस येथील चर्चासत्रात भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले. भारतात स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय.
सध्या भारतात लोकशाहीचे पतन होत आहे. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. युरोप, अमेरिकेने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करावी, अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना भारतीय लोकशाही धोक्यात आहे, असे विधान केले. “भारतीय लोकशाही फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही. तिचा परिणाम अन्य देशांवरही होतो. मला असे वाटते की, भारतीय लोकशाहीचे पतन झाल्यास त्याचा जगातील लोकशाहीलाही धोका पोहोचेल. त्यामुळे इतर जगाच्या दृष्टीनेही भारतातील लोकशाही फार महत्त्वाची आहे. भारतातील लोकशाहीचे पतन ही फक्त आमचीच समस्या नाही. ही समस्या आम्ही आमच्या पद्धतीने हाताळू. मात्र या समस्येचा जागतिक पातळीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या भारतात काय सुरू आहे, याची इतर देशांनाही माहिती असली पाहिजे. लोकशाहीवर हल्ला केला जात आहे,” असे राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले.