दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शासनाकडून पुरवठा केलं जाणारं स्वस्त धान्य गोर-गरिबांना न वाटता ते परस्पर थेट काळ्या बाजारात चढ्या भावाने विकले जातेय. स्वस्त खात्याशी संबंधित शासकीय अधिकारी, दलाल आणि टपून बसलेले काळे बोके यांच्या संगनमताने खुलेआम सातत्याने सुरू असलेला हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊनही सरकार केवळ गुन्हे नोंदविण्या पलिकडे अन्य कठोर कारवाई न करता अशा गुन्हेगारांची पाठराखण का आणि किती दिवस करणार आहे, असा खडा सवाल गोर गरीबांनी विचारला तर आश्चर्य वाटू नये.
परभणी शहर आणि जिल्ह्यातील परिसर स्वस्त धान्य काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्रीचे अड्डे बनले आहेत. गोर गरिबांची तोंडं मारुन, प्रसंगी त्यांना उपाशी ठेवून काळ्या बोक्यांच्या घशात कोंबण्याचे गोरखधंदे सातत्याने अगदी राजरोसपणे सर्वत्र सुरू आहेत.
प्रतिमाह गोर-गरिबांना वाटले जाणे अपेक्षित स्वस्त धान्य संबंधित शासनमान्य अधिकृत धान्य वाटप दुकानात न पोहोचता ते थेट चढ्या भावाने काळ्या बोक्यांच्या घशात अगदी घरपोच केले जाते, यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे ?
पुरवठा आयुक्त, तहसीलदार कार्यालय, पुरवठा अधिकारी, दलाल आणि चढ्या भावाने खरेदी करणारे काळे बोके, त्याशिवाय हाच चोरीचा माल खुलेआम घेणारे मुजोर व्यापारी अशाप्रकारे बनलेली चोरांची ही टोळी वरकमाईच्या पैशाने मस्तवाल बनली जाणे स्वाभाविक आहे. तरीही शासन मात्र गांधारीची भूमिका घेऊन अशा चोरांची पाठराखण करीत आहे.
शासनमान्य गोडावूनमध्ये साठवून ठेवलेल्या गोण्यां(पोत्या)मधील धान्य उंदीर जसे पोखरून खातात किंबहुना तसेच चोरांच्या या साखळीतील लिप्त हे चोर नसून ते चुकीच्या आकाराचे भले मोठे उंदीर राजाश्रयावर जातांना दिसत आहेत. ज्या बड्या बोक्यांचा उंदराच्या या टोळीला खुलेआम आशिर्वाद आहे, त्यांची आणि या उंदरांची लहान पिंजऱ्यात नव्हे तर थेट जेलच्या सळ्यांआड रवानगी जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत अशी पोखरणी भविष्यातही सुरुच राहिली जाईल, यात शंकाच नसावी.
स्वस्त धान्य दुकानात जाण्याऐवजी तो धान्याचा साठा परस्पर काळ्या बोक्यांच्या घशात कोंबण्यासाठी नेला जातो परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे का होईना, तो माल पकडला जाऊन मूळ चोर सोडून संन्याशाला (टेंपोच्या चालकास) बळीचा बकरा बनविले जाते. त्याच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्यापोटी चिरी मिरी देऊन चालकाचे सांत्वन केले जात असावे. तथापि याच काळ्या कमाईतून कमावलेली मलाई मात्र मोठ्या आकड्यातील असल्याने चालकाला सोडविण्यासाठी करावे लागलेले प्रयत्न नगण्य असेच असू शकते.
परभणी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज कुठे ना कुठे असे चोरीचे धान्य पकडल्याचे प्रकार नियमित घडत असतात. कर्तव्यावरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे उजागर झालेले हे प्रकार किमानपक्षी जनतेला तरी समजतात. तथापि पकडलेल्या त्या धान्याचे पुढे काय केले जाते, यांचा मात्र ठावठिकाणा कोणालाही लागू दिला जात नाही, ही बाब खेदजनक अशीच म्हणावी लागेल.
परभणी तहसीलदार कार्यालयाच्या निगराणी खाली पुरवठा केले जाणारे स्वस्त धान्य नेमके मंजूर अधिकृत दुकानावरच नेले जाते का अन्य कुठे ? यांची जबाबदारी त्या कार्यालयाची असो वा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची, यांचे नियंत्रणच नसावे की जाणीवपूर्वक चोरीच्या अशा घटनांकडे पाठ फिरवून भरघोस अशा वरकमाई साठी काळ्या बोक्यांचीच पाठराखण करण्यात धन्यता मानली जाते, हा खरा चौकशीचा भाग आहे. आगामी काळात अशाप्रकारे चोरीच्या मार्गाने काळ्या बाजारात चढ्या भावाने परस्पर विकले जाणारे शासनाचे स्वस्त धान्य गोरं गरिबांना न पुरवता धनदांडग्या चोरांना विकले गेल्यास किंवा असे प्रकार उघडकीस आल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार कार्यालयास जबाबदार धरुन कायदेशीर बडगा तर उगारला जाईलच त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठा आयुक्त, संचालक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारींद्वारे हे काळे धंदे चव्हाट्यावर आणले जातील, यात संदेह नसावा. चालू वार्ता या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांनी गोरं गरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी घेतलेला वसा पूर्णत्वास नेतांना यातील लिप्त धनदांडग्या चोरांची पर्वा केली जाणार नाही, हे निक्षून सांगायला काहीच हरकत नसावी.
परभणी जिल्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी पूर्णपणे खणून काढल्याशिवाय आणि यातील लिप्त बड्या धेंडांना जेवढी हवा दाखविल्याशिवाय गोरं गरिबांसाठी पुकारलेला हा लढा थांबविला जाणार नाही, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, हाच त्यांना सजगतेचा परंतु निर्वाणीचा इशारा आहे म्हटलं तरी चालेल.