दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर, मुखेड तालुक्याच्या सिमा भागातील कांही गावे तेलंगणा व कर्नाटक सीमेवर असून तालुक्यापासून २० ते २५ कि. मी. अंतरावर आहेत. त्या गावातील शेतकरी, शेतमजूर यांना दळणवळणासाठी मजबूत रस्त्यांची गरज असून ग्रामीण भागातील रस्ते मंजूर करून देऊन जनतेची दळणवळणाची सोय करावी, अशी मागणी भाजप नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य व्यंकटराव पाटीलगोजेगावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील दर्शविण्यात आलेले राज्य सिमेस जोडणारे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ रस्ता रेणापूर जिल्हा लातूर ते उदगीर, देगलूर मार्गे बोधन- तेलंगणा राज्य सिमेला जोडणारा रस्ता मंजूर असून या रस्त्याचे उदगीरपर्यंतचे काम प्रगतीपथावर चालू आहे. उदगीर तालुक्याच्या सिमेपासून रावणकोळा ते देगलूरपर्यंतचा हा रस्ता अतिशय खराब असून सध्या या रस्त्यावरूनवाहतूक करणे फारच अवघड झाले असून अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. सदरील रस्त्यास शासन स्तरावरून निधी मंजूर करून काम त्वरीत चालू करणे गरजेचे आहे.
केंद्रिय महामार्ग क्र. १६३ देगलूर – करडखेड मार्गे बिदर जाणारा रस्ता मंजूर असून त्या रस्त्याच्या सुधारणेच्या कामास अद्याप मंजूरी मिळालेली नाही. सदरील रस्ता हा पंजाब येथून येणाऱ्या भाविकांचे नांदेड व बिदर येथील शिख समाजाचे तिर्थक्षेत्र असलेल्या गुरु नानक झीरा यांच्या समाधीकडे जाणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून रोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात. त्यामुळे या रस्त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन काम चालू करणे अत्यंत आवश्यक आहे. बल्लूर फाटा ते बल्लूर, माळेगाव (म) मरतोळी, मुतनहिप्परगा चौरस्ता सोमूर फाटा, मानूर ते तेलंगणा राज्य सिमा प्रतिमा- ७२ लांबी २७/०० ते ५८/६०० व सोमूर रमतापूर बिजलवाडी पुर्व तांडा ते बिजलवाडी लांबी ३/५००ग्रामा ६३ व जोडरस्ता पश्चिम तांडा बिजलवाडी लांबी ०/०० ते २/०० ग्रामा- ६४ मार्ग बादलगाव कर्नाटक राज्य सिमेस जोडणारा हा रस्ता हायब्रीड न्युईटी योजनेतंर्गत दुपदरीकरण केल्यास महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक राज्य सिमा या तीनही राज्याच्या दळणवळणाच्या वाहतूकीचा मार्ग सोयीस्कर होऊ शकेल. सदरील रस्त्यांची स्थगिती उठवणे, निधी मंजूर व नविन मान्यता देऊन काम चालू करणे व रस्ता हायब्रीड न्युईटी हॅम योजनेअंतर्गत दुपदरीकरण करण्याच्या कामास तत्त्वतः मान्यता दिल्यास या भागात दळणवळणाची एक हरित क्रांती घडवू शकेल, अशा मागणीचे निवेदन देऊन दिले. यावर मंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करुन उदगीर ते देगलूर या रस्त्याचे कामासंदर्भात मुख्य अभियंता शेलार यांना दुरध्वनी वरून बोलून संबंधित कामाबद्दल पुढील कार्यवाही करण्यात यावे असे आदेशित केले व रावणकोळा ते चिंचगाव नदीवरील पुल मंजूर करण्याचे निवेदन दिले.