दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-आज संत रूपलाल बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अंजनगाव सुर्जी शहरातून पालखीची भव्य शोभयात्रा काढण्यात आली.सात दिवसाच्या भागवत सप्ताह नंतर साधु संत येती घरा ! तोची दिवाळी दसरा !! संतांच्या ह्या उल्लेखनीय ओळी प्रमाणे शहरातमध्ये भव्य शोभायात्रा आणि भक्तांच्या ओठून हरिनामाच्या गजराने भक्तिमय वातावरण झाले होते.त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत रुपलाल बाबा हे मुळ पहुरगावचे.रुपलाल शामजी बुंदे हे त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांच्या आई सोनाबाई.जेव्हा बाबांनी घरदार संसार सोडून दिला तेव्हा त्यांचा मुलगा तुकाराम हा त्यांच्या आईच्या उदरात केवळ पाच महिन्यांचा होता.रुपलाल बाबा गाडगे बाबांसोबत निघाले तेव्हा त्यांनी संसाराकडे कधीही वळुन पाहिले नाही.संत गाडगे बाबांना संत रुपलाल बाबांनी गुरू केले होते.नंतर संत रुपलाल बाबांनी गावोगावी जाऊन सप्ताह सुरु केले.स्वतः पायदळ व मागे बैलगाडी असा त्यांचा प्रवास होता.सात दिवसांचा सप्ताह सव्वा महिन्यावर नेत चार दिवस संसार सोडा | मुखाने राधा कृष्ण बोला || पुढे बाबांनी नेहमी प्रमाणे प्रवास करून अंजनगाव सुर्जीला बाजारात येऊन सप्ताह मांडला त्यात डेबुजींचे किर्तन झाले.आयुष्यभर बाबांनी गावोगावी जनतेची सेवा केली.अंगावर थिगळयांचे कपडे घालुन गावोगावी भ्रमण करून जन-जागृतीचे खरे कार्य बाबांनी केले.अंजनगाव सुर्जीच्या विठ्ठल मंदिरात ठाण मांडून त्यांनी जनतेची सेवा केली.मला नेहमी विठ्ठल मंदिराच्या पायरिशी ठेवावे असे भक्तांना सांगत चैत्र शुद्ध पंचमीला जगाचा अखेरचा निरोप घेतला आणि ब्रम्हांडात विलीन झाले.टाळ मृदुंगाच्या गजरात रुपलाल बाबांच्या पार्थिवाचे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि नंतर बाबांनी सांगितल्याप्रमाणे विठ्ठल मंदिराच्या पायरी जवळ समाधी बांधण्यात आली.