दैनिक चालू वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड –जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली असून अनेक बाजार समित्यांवर वर्षानुवर्षे आपलेच अधिराज्य गाजवणाऱ्या मातब्बरांना या निवडणुकीत मात्र विरोधकांनी खिंडीत गाठण्याचे ठरवल्यामुळे अनेक ठिकाणी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र काही ठिकाणी मातब्बरांना आव्हान देण्यासाठी विरोधकांना उमेदवार मिळत नसल्याचे समोर येत असून बीड, गेवराई, माजलगाव, परळी या तालुक्यातल्या बाजार समिती निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाटोदा, कडा, वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई बाजार समितीतही मोठी चुरस होणार. कालपर्यंत 10 पैकी 9 बाजार समित्यांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. धारूरमध्ये कालपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. बीड जिल्ह्यातील 10 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रणांगण तयार झाले असून कालपर्यंत पाटोदा 25, वडवणी 27, अंबाजोगाई 74, कडा 15, बीड 52, केज 42, माजलगाव 63, गेवराई 61 तर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. धारूरमध्ये कालपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातल्या महत्वाच्यासमजल्या जाणाऱ्या बाजार समित्यांवर मातब्बरांचे वर्चस्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बीड बाजार समिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, गेवराई अमरसिंह पंडित, माजलगाव प्रकाश सोळंके, परळी आ. धनंजय मुंडे, पाटोदा, कडा सुरेश धस यांच्या ताब्यात आहेत. यावर्षी सर्वच बाजार समित्यांवर आपले वर्चस्व सिद्ध करण्या हेतु विरोधकही आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत असून मातब्बरांच्या ताब्यातून बाजार समिती काढून घेण्यासाठी काही ठिकाणी विरोधक एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. 3 तारखेनंतर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकींची खरी लढत समोर येईल. काही ठिकाणी एकास एक तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समित्या आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी मातब्बरांनी मोर्चे बांधणी केली आहे.