दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या अर्थसाहाय्यातून साकारले पाणीदार गाव काटकंळबा ता. कंधार जि. नांदेड हा भाग अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जातो. ८९५ मिलीमीटर सरासरी वार्षीक पर्जन्यमान असलेल्या या भागात २०१२ मध्ये दुष्काळाची तीव्र झळ बसली होती. जिल्ह्यातील एकूण १६ तालुक्यांपैकी कंधार, मुखेड, लोहा, देगलूर व नायगाव हे तालुके नेहमी दुष्काळाच्या छायेत असतात.
जिल्ह्यातील कंधार तालुका हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो. याच तालुक्यातील काटकळंबा या गावाने जल व मृद संधारणाच्या कामातून दुष्काळावर विजय मिळविला आहे.
एकूण भौगोलिक क्षेत्र एक हजार २२१ हेक्टर असून त्यापैकी ९८० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तर पडीत क्षेत्र २४० हेक्टर क्षेत्र आहे. एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के जमीन कोरडवाहू स्वरूपाची होती. यात मुख्य पिक कापूस, सोयाबीन व ज्वारी घेतली जायची. यापैकी केवळ ६८ हेक्टर जमीन ओलिताखाली होती. गावात ७६० कुटुंब असून लोकसंख्या साधारपणे ४६५९ आहे. गावातील एकूण कुटुंबापैकी १८२ कुटुंब अनुसूचित जातीचे आहेत. काटकळंबा गावचा शिवार हा डोंगराळ, उताराच्या व शेतजमीन धूप झालेल्या जमिनी होत्या. दर दोन-तीन वर्षानी दुष्काळ ठरलेलाच असायचा. सन २०१२ ते २०१६ अशी चार सलग वर्ष दुष्काळात गेली. २०१२ साली गावात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. जमिनीचे मोठ्या प्रमाणात धूप झाल्यामुळे शेतीचे उत्पन्न घटले.
गावात तयार झाली युवकांची फळी
अश्या दुष्काळ व टंचाई परिस्थितीत गावचे भूमिपुत्र तथा मीरा भाईंदर महानगर पालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व शिक्षक बाबूराव बस्वदे यांनी गावातील तरुणांना एकत्र करून गावाची स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण या बाबतीत गावचा विकास करण्यासाठी युवकांना प्रेरित करून कामाला सुरुवात केली. गाव विकासाची सुरुवात त्यांनी स्वच्छ, सुंदर व आरोग्य संपन्न गाव या धर्तीवर सुरू केली. गावाला टंचाईच्या खाईतून काढून पाणीदार गाव करण्यासाठी गावातील मोहन पवार, बालाजी पानपट्टे, गोविंदराव वाकोरे, सुभाष मोरे, सदाशिव हम्पल्ले, शिवाजी वाकोरे, राष्ट्रपाल चावरे, साईनाथ कोळगिरे, अशोक चावरे, रामदास बस्वदे यांच्यासह असंख्य युवकांनी एकत्र येत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यास सुरुवात केले.
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे कार्य
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्था मागील ६० वर्षापासून शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, महिला विकास आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांच्या माध्यमातून पाणलोट विकास, दुष्काळ निर्मुलन, रोजगार निर्मिती, तलावातील गाळ काढणे आदी उपक्रम राबवून कित्येक टंचाईग्रस्त गावांना दिलासा दिला आहे. काटकळंबा गावातील बाबुराव गुरुजींसह गावकर्यांनी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांना भेटून संस्थेच्या माध्यमातून गावात सर्वांगीण ग्रामविकास प्रकल्प राबविण्याची विनंती केली होती. संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनीही गावकर्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविले. संस्थेने विविध सामाजिक संस्था, उद्योगसमूहाचे सामाजिक दायित्व, नाबार्ड तसेच गावकर्यांना सहकार्याने सन २०१४ -१६ या कलावधीत खालील सामाजिक उपक्रम पूर्ण करून गाव विकासाची सुरुवात केली.
स्वच्छता व आरोग्य याविषयी जनजागृत
स्वच्छतादूत माधवराव शेळगावकर यांच्या माध्यमातून गावात स्वच्छता व आरोग्य याविषयी जनजागृती करण्यात आली. बालाविकास संस्था वरंगल यांच्या सहाय्यातून गावात शुद्ध पेयजल पुरवठा. गाव स्वच्छता अभियान व घरोघरी शौच्छालय बांधकाम वृक्ष लागवड हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, गंगापूर पाटोदा आदी गावांचा अभ्यास दौरा करून पाणलोट विकास, गाव विकासाची सूत्रे समजून घेतली. हे उपक्रम राबविण्यात आल्यामुळे गावात स्वच्छता व आरोग्य संपन्न वातावरण तयार झाले. यानंतर गावकर्यांनी पाणलोट विकास करण्यावर लक्ष केद्रींत करून गाव पाणीदार जलसमृद्ध करण्याचा संकल्प केला. प्रकल्पाची अंमलबजावणी
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून सेववर्धिणी संस्था पुणे व ऍटलस काप्को चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहाय्यतून सन २०१६-१८ या कालावधीत जलदूत प्रकल्प राबविण्यात आला. मृद व जलसंधारण, माथा ते पायथा पाणलोट विकास संदर्भात गावातल्या तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले. जलदूत प्रकल्पामुळे गावात पाणलोट विकास कामे तांत्रिक पद्धतीने राबवून घेण्यासाठी युवकांची फळी तयार झाली. या प्रकल्पामुळे गावात मृद व जलसंधारण, माथा ते पायथा पाणलोट विकास महत्व व गरज समजले. गावातील युवकांना पाणलोट प्रकल्पाचे विविध उपक्रम त्याची तांत्रिक माहिती देऊन सक्षम केले.
डोह मॉडेल नाला खोलीकरण व रुंदीकरण
सन २०१५-१६ मध्ये राज्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत होते. सुरुवातीच्या टप्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी गावाची निवड झाली नव्हती. असे असले तरी संस्थेने २०१५ मध्ये केअरिंग फ्रेंडसच्या सहाय्यातून एक किलो मीटर नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण डोह पद्धतीने पूर्ण केले. यासाठी गावकर्यांनी ही भरभरून योगदान दिले. डोह मॉडेल पद्धतीने म्हणजे दर ५०-६० मीटर अंतरावर उताराप्रमाणे डोह करण्यात आले. संस्थने नाविन्यपूर्ण डोह मॉडेल पद्धतीने नाला खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण केल्यामुळे अपेक्षित फायदा गावकर्यांच्या लक्षात आला होता. गावकर्यांनी उर्वरित कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला.
प्रशासनाचा प्रतिसाद
कंधारच्या तत्कालीन तहसीलदार अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, कृषी अधिकारी संजय गायकवाड यांनी गावाच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांच्याकडे काटकळंबा गावासाठी शिफारस केली. यानंतर नाम फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय व लोकसहभाग यांच्या माध्यमातून १० किलोमीटर मुख्य नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यापूर्वी नाल्याची रुंदी १५-२० फुट व खोली ३-५ फुट होती. पुराचे पाणी नाल्यातून शेतात येत होते. खोलीकरण झाल्याने आता नाल्याची रुंदी ५० फुट व खोली २० फुट झाली आहे. परिणामी पुरापासून शेतजमिनीचे संरक्षण झाले, जमिनीची धूप कमी झाली. पुरामुळे होणारे पिकाचे नुकसान थांबले. आणि मुख्य बदल म्हणजे पाण्याचा झाल हळू हळू भूगर्भ पाणी पातळीत वाढ होऊ लागली होती. याचा परिणाम असा झाला कि गावकर्यांनी आता माती अडवा व पाणी जिरवा यावर भर देण्याचे ठरविले. माथा ते पायथा मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी त्यांनी पुन्हा संस्थेकडे मागणी केली.
एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल प्रकल्पाची सुरुवात
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व ऍटलस काप्को चॅरिटेबल फाउंडेशनच्या अर्थसहाय्यातून गावाची भरारी झाली. माथा ते पायथा मृद व जलसंधारण उपचार व हवामान बदल अनुकूल पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात आला. सुरूवातीला एकूण दोन लाख ७४ हजार रुपयाचे श्रमदान पूर्ण केले. एकात्मिक पद्धतीने पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल प्रकल्पाने गाव हा गावा जलसममृद्ध होण्याबरोबरच हवामान अनुकूल शेती करणारे गाव बनले.
माथा ते पायथा पाणलोट उपचार
सन २०१९ ते आजपर्यंत गावाच्या एकूण उपचारक्षम क्षेत्रापैकी म्हणजे एक हजार १९२ हेक्टर क्षेत्रापैकी ६२० हेक्टर क्षेत्रावर पाणलोटाची कामे करण्यात आली आहेत. गावातील एकात्मिक पाणलोट विकास कामाची वैशिष्टे म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केल्या जात आहे. प्रामुख्याने माथा ते पायथा हे विकासकामाचे तत्व ठरवून जल, मृद संवर्धनाची कामे झाली. ६२० हेक्टर क्षेत्रापैकी ९५ हेक्टर पडीत क्षेत्रावर सलग समतल चर, खोल समतल चर, गलीप्लग, अर्दन बंधारे, तसेच उर्वरित ५२५ हेक्टर वहीती क्षेत्रात बांधबंदिस्ती, चिबड चार, दगडी सांडवे आदी कामे पूर्ण झाली आहेत. येत्या दोन वर्षात उर्वरित क्षेत्रात याच पद्धतीने कामे पूर्ण होणार आहेत. तसेच नाला उपचारामध्ये सिमेंट बंधारे, गॅबियन जाळीचे बंधारे, लूज बोल्डर, दगडी कट्टे आदी कामे प्रस्तावित आहेत.
नैसर्गिक साधन सामुग्री बळकटीकरण
शिवारातील नैसर्गिक साधनसामुग्री बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने वनीकरणासारखे पूरक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मुख्य नाला काठावर जवळपास ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात बांबू व इतर वृक्षांचा समावेश आहे. गावातील रस्त्यालगत २ हजार करंज वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पडीत क्षेत्रावर कडू निंब व सीताफळ लागवड करण्यात येत आहे.
शेतीविषयक प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिक
सगरोळी कृषी विज्ञान केंद्र शेतकर्यांसाठी प्रशिक्षण, मेळावे, पीकप्रात्यक्षिक आयोजित करून शेतकर्यांच्या उन्नतीसाठी काम करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने काटकळंबा गाव दत्तक घेऊन अनेक शेतीप्रयोग या ठिकाणी राबवीत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत गावातील लाभार्थी शेतकर्यांना विविध विषयावरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी आधुनिक पीकपद्धत ,पिक बदल, हवामान अनुकूल वाणाची निवड, उद्योग व्यवसाय आदी विषयावर शेतकर्यांना तज्ञ व्यक्तीमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार यांनी गावकर्यांच्या मागणीनुसार खरीप व रब्बी पेरणी पूर्व मागर्दर्शन, शेती दिन, अन्नसुरक्षा आदी प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या माध्यमातून आयोजित केले. याचा परिणाम स्वरूप शेतकरी आज हवामान अनुकूल शेती शेती, पिक बदलाकडे वळले आहेत. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे, कृषी अभियंता वैजनाथ बोंबले, प्रा.व्यंकट शिंदे, डॉ. कृष्णा अंभुरे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. निहाल मुल्ला आदी वेळोवेळी गावकर्याना आधुनिक पिक पद्धती, शेतीचे नवनवीन प्रयोग, पीकबदल, प्रक्रिया उद्योग, आधुनिक शेती औजारे, कीड व रोग नियंत्रण, फळबाग लागवड, पशुधन व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, चारा लागवड याविषयी मार्गदर्शन करीत आहेत .
गावकर्यांचे मनोगत
प्रशासकिय कामानिमित्य मला हिवरे बाजार, राळेगणसिद्धी व इतर आदर्श गावांना भेट देण्याचे योग येतो, तेंव्हा मला माझ्या गावाची टंचाई स्थिती आठवते. आपलही गाव आदर्श का असू नये या विचारातून मी गावातील युवकांना प्रेरणा देत राहिलो व जमेल तसे मदत करत राहिल्याने गावातील युवकांची फळी तयार झाली. मराठवाड्यातील आदर्श गावच्या यादीत माझ्या गावचा समावेश व्हावा यासाठी मी प्रयत्नात असेन.
– डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त मीरा भाईंदर महानगर पालिका.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत मी माझे गाव स्वच्छ, आरोग्यसंपन्न व पाणीदार करण्यासाठी समोर आलो, माझ्या गावकर्यांनीही विशेषत युवकांनी मला साथ दिली. यामुळेच गावात आज ही जल संपन्नता पाहायला मिळत आहे. यापुढे संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवू आणि याही पुढे आदर्श गाव गंगापूर पाटोदा ,हिवरे बाजार, राळेगण सिद्धीच्या धर्तीवर माझ्या गावाला आदर्श करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.मोहन पवार
– सचिव जय शिवराय पाणलोट विकास समिती काटकळंबा.
संस्थेने आमच्या गावाला दिशा दिली यापुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यावर माझ्या ग्रामपंचायतीचा भर राहील .स्वच्छ,सुंदर व आरोग्यसंपन्न ,पाणीदार गाव,आदर्श गाव म्हणून मी काटकळंबा गावची ओळख निर्माण करणार आहे.
– शिवाजी दिगांबर वाकोरे, सरपंच प्रतिनिधी काटकळंबा.
—-